लक्षवेधी : औषधे कमजोर, आजार शिरजोर

सध्या भेडसावणार्या दहा प्रमुख धोक्यांमध्ये ‘रोगाणुरोधी प्रतिकारशक्ती’ म्हणजेच अँटीमायक्रोबायल रेझिस्टन्स (एएमआर) ही समस्या समाविष्ट झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.
रुग्णाच्या शरीरात संसर्ग निर्माण करणार्या रोगजंतूंची ताकद वाढून जेव्हा हे रोगजंतू अँटीबायोटिक औषधांना म्हणजेच प्रतिजैविकांना दाद देणं बंद करतात, तेव्हा अशा परिस्थितीला एएमआर असं म्हणतात. यामध्ये जीवाणू, विषाणू, परजीवी यांसारखे सूक्ष्मजीव प्रतिजैविकांविरुद्ध लढा देण्याचे तंत्र विकसित करतात. परिणामी, ही औषधे कितीही प्रभावी असली तरी ती कुचकामी ठरतात आणि शरीरातील संक्रमण कायम राहते. इतकेच नव्हे तर झपाट्याने इतरांमध्ये पसरते. आजची जागतिक परिस्थिती पाहिल्यास अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल्स, अँटीङ्गंगस औषधांविरोधात बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस व परजीवी यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिकार विकसित केला आहे.
आजारी पडल्यानंतर किंवा गंभीर व्याधी जडल्यानंतर औषधोपचार हा एकमेव आशेचा किरण असतो. औषधांमुळे आजार बरा होईल किंवा नियंत्रणात राहील ही सकारात्मक मानसिक धारणाही व्याधीमुक्त होण्याच्या प्रक्रियेत मोलाचे काम करते, हे सिद्ध झाले; परंतु शरीराची हानी करणार्या जीवाणू-विषाणूंवर औषधे कामच करत नसतील तर आरोग्य यंत्रणा कोलमडणे अटळ आहे. यातून मृत्यूदर वाढण्याचा धोका उद्भवू शकतो. संसर्ग नियंत्रित करणे अशक्यप्राय होण्याचा धोकाही आहे.
एएमआर ही केवळ आरोग्यव्यवस्थेची समस्या नाही, ती औषधांच्या वापराबाबत असलेल्या गोंधळाचा आणि उदासीनतेचाही पुरावा आहे. ‘डायग्नोस्टिक स्टीवर्डशिप’, म्हणजे आजारानुसार योग्य औषधांचा वापर, याला अजूनही देशोदेशींची आरोग्यप्रणाली पुरेसे महत्त्व देत नाही. औषधांचा गैरवापर किंवा अपुरा वापर यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते आणि पूर्वी प्रभावी असलेल्या औषधांचा काही परिणामच दिसत नाही. भारतात सेल्ङ्ग-मेडिकेशन आणि ‘ओव्हर-द-काउंटर’ औषधे सहज मिळणे यामुळे अँटीबायोटिक्सचा अमर्याद वापर होतो. परिणामतः सामान्य संसर्गांनाही औषधे काम करत नाहीत.
एका पाहणीनुसार, दरवर्षी भारतात 56 हजार नवजात बालकांचे मृत्यू सेप्सिसमुळे होतात. हा संसर्ग प्रथम श्रेणीतील अँटीबायोटिक्सना दाद देत नाही. शतकातील सर्वांत मोठी महामारी ठरलेल्या कोविडच्या काळात आयसीएमआरने 10 रुग्णालयांत केलेल्या अभ्यासात असे स्पष्ट झाले होते की, एएमआरमुळे कोविड रुग्णांचा मृत्यूदर 50 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढला. जगभरात कोविड-19 च्या काळात लक्षणांवर आधारित औषधोपचार करूनही लाखो जणांचे मृत्यू झाले. अमेरिका, इटली, चीन आणि भारतात याचे गंभीर परिणाम दिसले. त्यामुळेच पुढे नवीन रोग उद्भवल्यास औषधे निष्प्रभ ठरण्याची शक्यतावजा भीती वर्तवली जात आहे.
सूक्ष्मजीव औषधांशी यशस्वी लढा देतात, तेव्हा त्या औषधांनी आजार बरा करणे अत्यंत कठीण किंवा अशक्य होऊन बसते. अॅलोपॅथीतील अनेक औषधांमध्ये काही मर्यादा असतात. परिणामी ती कालांतराने निष्प्रभ होतात. नव्या आजारांसाठी नवीन औषधांचा शोध आणि प्रयोगशाळा चाचण्या या वेळखाऊ आणि खर्चिक असतात. त्यामुळे संसर्ग रोखण्याच्या लढ्याला वेळ मिळत नाही. कोविडनंतर नव्या आजारांनी पुन्हा एकदा जगात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कधी चीन, कधी आङ्ग्रिकेतील देशांमधून या आजारांची सुरुवात होते आणि मग काही दिवसांत ते जगभर पसरतात. ही अवस्था पूर्वी कधीच नव्हती. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा देताना असे म्हटले आहे की, 2050 पर्यंत जीवाणू, विषाणूंनी मिळवलेल्या प्रतिकारशक्तीमुळे दरवर्षी 1 कोटी लोक मृत्यूमुखी पडू शकतात. ‘लान्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, 2019 मध्ये 40.19 लाख मृत्यू केवळ एएमआरमुळे झाले.
नवीन अँटीबॅक्टेरियल एजंट्स विकसित होण्याचा वेग हा प्रतिकारशक्ती निर्माण होण्याच्या वेगाच्या तुलनेत कमी आहे. परंतु जागतिक व्यापार, प्रवास यामुळेही एएमआरचे संक्रमण जागतिक स्वरूप घेत आहे. त्यामुळे एएमआरवर वेळीच उपाययोजना झाली नाही, तर सर्जरी किंवा रुटीन उपचार करणेही भविष्यात धोकादायक ठरू शकते. कारण संसर्ग टाळण्याचे औषधच निष्प्रभ ठरत असल्याने उपचाराचे मूळच हरवणार आहे. विकसनशील देशांमध्ये औषधांच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे औषधाचा पुरेसा डोस न घेण्याची प्रवृत्ती सर्रास दिसते.
पण यामुळे अनेकदा रोग अधिक गंभीर होतो. हे लक्षात घेता, भविष्यातील पिढ्यांसाठी औषधांचा परिणाम टिकवून ठेवण्यासाठी ‘अँटीमायक्रोबियल स्टीवर्डशिप’ महत्त्वाची आहे. याचा उद्देश म्हणजे योग्य रोगासाठी योग्य औषध, योग्य डोस आणि योग्य वेळेला दिले जावे. यासाठी भारतासह विकसनशील आणि गरीब देशांमध्ये मोठी जनजागृती मोहीम राबवावी लागणार आहे. याचे कारण एएमआरसाठी वापरली जाणारी औषधे अत्यंत महाग असतात आणि ती मोजक्या जणांचेच प्राण वाचवू शकतात. भारतात औषधांचा बाजार अनियमित आहे. किमती ठरवताना इथे पारदर्शकपणा नसतो.
त्यातच बनावट औषधांचा काळाबाजार कोट्यवधी लोकांना मृत्यूकडे ढकलतो आहे. या नकली औषधांची किंमत मूळ औषधांच्या तुलनेत 10 ते 500 पट कमी असते, पण गुणवत्ता मात्र शून्य असते. साहजिकच अशी औषधे वारेमाप प्रमाणात घेतली जातात. परंतु ही औषधे सतत घेत राहिल्याने रोग नाहीसे होत नाहीत, उलट नवीन आजार जन्म घेतात. परिणामी, शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते आणि ते विविध आजारांचे घर बनते. गेल्या चार वर्षांत लाखो लोक एएमआरमुळे मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले आहे. हे लक्षात घेता एएमआरविषयी जागरूकता वाढवली तरच पुढील संकटांपासून आपले संरक्षण करता येईल. अन्यथा ही जागतिक आरोग्य आपत्ती कोविडप्रमाणेच हाहाकार उडवू शकते.
इंडियन मेडिकल असोसिएशनने 2023 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर) हे मानवासाठीच नाही तर प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणासाठीही धोकादायक आहे. ‘एएमआर’मुळे दरवर्षी सुमारे सात लाख रुग्णांचा मृत्यू होत असून 2050 पर्यंत 10 दशलक्ष मृत्यूंपर्यंत आकडा वाढण्याचा धोका असल्याचे आयएमएने म्हटले होते. त्यामध्येही रुग्णांकडून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट औषध विक्रेते आणि चुकीच्या व्यक्तीकडून औषधांचा सल्ला घेऊन त्याचे सेवन केल्याने हा प्रकार वाढतो, असे निरीक्षण असोसिएशनने नोंदवले होते. 1987 पासून शास्त्रज्ञ कोणतेही नवीन प्रतिजैविक रेणू विकसित करू शकले नाहीत. याचे कारण औषध कंपन्यांना संशोधनात ङ्गारसा व्यावसायिक ङ्गायदा नसतो. परिणामी, जुनी औषधे सतत वापरून निष्प्रभ होत चालली आहेत. या पार्श्वभूमीवर सगळ्याच क्षेत्रांनी प्रतिजैविक औषधांचा गरजेनुसारच वापर करण्याची गरज आहे.
भारत सरकारने 2013 मध्ये अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स सर्व्हिलन्स अँड रिसर्च नेटवर्कची सुरुवात केली होती. 2017 मध्ये याबाबत राष्ट्रीय कृती आराखडाही प्रकाशित केला होता. आयसीएमआरने नॉर्वे, जर्मनी आदी देशांशी संशोधन भागीदारी केली आणि रुग्णालयांमध्ये अँटीबायोटिक स्टीवर्डशिप प्रोग्राम पायलट तत्त्वावर लागू केला. पण निधीचा अभाव, समन्वयाची कमतरता आणि अनेक जबाबदार यंत्रणांमध्ये गोंधळ यामुळे ‘वन हेल्थ अॅप्रोच’ केवळ कागदावरच उरला.





