– हेमंत देसाई
अफगाणिस्तानातील तालिबान्यांना अक्कल आली असेल, तर त्यांनी आपले कालबाह्य तत्त्वज्ञान फेकून देऊन, व्हिएतनामसारखा प्रगतीचा रस्ता धरला पाहिजे.
मूलतत्त्ववादातून निर्माण झालेल्या समस्यांचे अफगाणिस्तानात प्रत्यंतर आले आहे. म्हणूनच “शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ या संघटनेने मूलतत्त्ववाद व दहशतवादाच्या विरोधात धोरण ठरवून, या दोन्ही आव्हानांचा परिणामकारकपणे मुकाबला करावा, असे या संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
त्यांच्या या भाषणाचे स्वागतच केले पाहिजे. भारतात सणासुदीच्या काळात अतिरेकी हल्ले करण्याच्या तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी देशभरातून नुकतीच अटक केली आहे. यातील जान मुहम्मद शेख हा धारावीचा रहिवासी असून, त्याचे दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवादाची किंमत भारताला वारंवार चुकवावी लागत असून, या आव्हानाचा सर्व देशांनी समन्वयाने प्रतिकार करण्याची आवश्यकता आहेच. सुदैवाने अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबानी राजवटीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेपर्यंत व परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानशी कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत, असे जाहीर केले आहे. नाणेनिधीकडून अफगाणिस्तानला केली जाणारी मदत रोखण्यात आली असून, सध्या तरी कुठलीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही.
15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातील सत्ता तालिबानने ताब्यात घेतली व हंगामी सरकार स्थापन केले. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेली आश्वासने तालिबान पाळतो की नाही, याचे निरीक्षण केले जाईल, असे अनेक जागतिक नेत्यांनी जाहीर केले आहे. मुळात अफगाण सरकारमध्ये अठरा मंत्री हे दहशतवाद्यांच्या वॉंटेड लिस्टमधले आहेत.
हे सरकार मानवी हक्कांचे व स्त्रियांच्या अधिकारांचे रक्षण करते का, हेदेखील पाहिले जाईल. कोणतेही कारण नसताना भर रस्त्यात गोळीबार करणे, आपल्या रास्त मागण्यांसाठी महिलांनी काढलेल्या मोर्चांवर लाठीमार व गोळीबार करणे, पत्रकारांना पट्ट्याने मारणे असे प्रकार तालिबान्यांनी चालवले आहेत.
हे प्रकार थांबले नाहीत, तर आयएमएफच काय, जागतिक बॅंक असो वा अन्य संस्था, यांची मदत मिळणारच नाही. त्या देशात कमालीचे दारिद्य्र व दुष्काळ असून, त्यामुळे नागरिकांचे हालच होणार आहेत.
तालिबान्यांनी अनेक घरांवरच्या वा इमारतींबाहेरच्या भिंतींवरची आनंदात असलेल्या मुलींची चित्रे काढून टाकली आहेत. दोहा येथे अमेरिकेसमवेत झालेल्या शांतता कराराचे काढण्यात आलेले फोटो ठिकठिकाणी लावण्यात आले होते, तेही फेकून दिले गेले आहेत.
अफगाणिस्तानात खनिजसंपत्तीचे वैपुल्य असले, तरी त्याचे उत्खनन करण्यासाठी व वाहतूक करण्याकरिता लागणारा पैसाही सरकारकडे नाही. चीन पुरवठा झाल्यानंतरच मालाचे पैसे देतो. अफगाणिस्तानात अल-कायदा, टीटीपी, आयएमयू (उझबेक), ईटीआयएम या संघटनांची वेगवेगळी उद्दिष्टे आहेत.
इस्लामी राज्याच्या त्यांच्या संकल्पनाही अलग अलग आहेत. त्यामुळे सगळे तालिबान एक आहेत, असेही मानण्याचे कारण नाही. इस्लामिक स्टेट खोरासान या संघटनेने काबूल विमानतळावर बॉम्बफेक केली. जागतिक खिलापत असावी, असे या संघटनेचे स्वप्न आहे. या संघटनेचा नेता अबू बकर अल बगदादीने सिरीयामध्ये अमेरिकी सैन्याने वेढल्यावर आत्महत्या केली. बगदादीची ही संघटना अत्यंत क्रूर व आक्रमक आहे.
उलट तालिबानमध्ये जे सरकार स्थापन झाले आहे, त्यास खिलाफतीविना शरिया हवी आहे. अमेरिकाविरोध यापलीकडे तालिबान्यांमध्ये वैचारिक एकता नाही. इस्लामी इतिहास वा गव्हर्नन्सचेही त्यांना ज्ञान नाही. अफगाणिस्तानात प्रत्येक गोष्टीची आयात केली जाते आणि कारखानदारी उत्पादन होतच नाही.
तरीदेखील आपण मवाळ झाल्यास, आपल्या समर्थकांना ते आवडणार नाही अशी त्यांची भावना आहे. 9/11 नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला. त्यावेळी दहशतवादविरोधी आघाडीत अमेरिकेने पाकिस्तानला बळेबळे सामील करून घेतले. त्यामुळे पाकिस्तानमधील धर्मांध संघटना खवळल्या. मग टीटीकेच्या अतिरेक्यांनी आत्मघातकी बॉंबिंग केले.
अफगाणिस्तान हा विविध टोळ्यांनी बनलेला समाज आहे. प्रेषिताच्या काळात नेशन स्टेटची कल्पनाच नव्हती. या पार्श्वभूमीवर गेल्या शतकात 1933 साली मौलाना अब्दुल मौदुदींनी पाकिस्तानची मागणी अमान्य केली होती. द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताद्वारे पाकिस्तानची निर्मिती झाली आणि तेव्हापासून तो देश धार्मिक दहशतवादात गुरफटून गेला.
पाकिस्तानची प्रगतीच झाली नाही. उलट भारतासारख्या लोकशाहीवादी देशाने विविध क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती केली. या प्रगतीत खोडा घालण्याचे काम पाकिस्तान वारंवार करत असला, तरी भारताने त्यास अनेकदा चोप दिला आहे.
आंतरराष्ट्रीय जगतात पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र असल्याचे मानले जाते. तसेच आजही त्याला वारंवार भिकेचा कटोरा घेऊन अमेरिका, तसेच आयएमएफ व जागतिक बॅंकेच्या दरवाजात उभे राहावे लागते. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे जरूर आहेत. ही अण्वस्त्रे भारतावर डागून भारताचे अस्तित्व मिटवून टाकू, अशा पोकळ वल्गना पाकने कित्येकदा केल्या आहेत. परंतु भारताच्या तुलनेत संरक्षणसज्जतेत पाकिस्तान जवळपास कुठेही नाही.
भारतातील कृषी, उद्योगधंदे आणि नवीन तंत्रज्ञानयुक्त व्यवसाय या कोणत्याही क्षेत्रात पाकिस्तानची भारताशी तुलनाच होऊ शकत नाही. काश्मीर वा अन्य ठिकाणी घुसखोर पाठवून, भारताबरोबर अघोषित युद्ध करण्याचे पाकचे सातत्याचे प्रयत्न आहेत. परंतु त्यामुळे त्या देशाचा कोणताही फायदा झाला नाही. उलट भारताबरोबरचा व्यापार कमी झाल्यामुळे, पाकिस्तानचे नुकसानच अधिक झाले.
दहशतवाद्यांना आश्रय दिल्यामुळे, आर्थिक निर्बंधही लादण्यात आले. पेशावरसारख्या ठिकाणी शाळेवर दहशतवादी हल्ला होऊन, कित्येक निष्पाप मुलांचा बळी गेला. पाकिस्तानातील मशिदींवरही आत्मघातकी हल्ले झाले. थोडक्यात, दहशतवादी आगीत पाकिस्तान स्वतःच जळत आहे.
अफगाणिस्तानात याचीच पुनरावृत्ती झाली असून, अमेरिकेला पळवून लावले, याबद्दलचा आनंद साजरा करण्यापलीकडे तालिबानी काहीच करू शकत नाहीत. ते देशाला मध्ययुगात मात्र घेऊन जाऊ शकतात. त्यांच्याकडे विकासाची, आधुनिक ज्ञानविज्ञान, तंत्रज्ञानाची दृष्टीच नाही.
एकेकाळी व्हिएतनामच्या युद्धात 20 लाख लोक मृत्यू पावले. त्यात 50 हजार अमेरिकी सैनिकांचा बळी गेला. मात्र आज व्हिएतनाम समृद्ध आहे. विचाराने तो कम्युनिस्ट देश असला, तरी राष्ट्रउभारणीसाठी त्याने जुने कालबाह्य तत्त्वज्ञान बाजूला ठेवले.
अफगाणिस्तानातील तालिबान्यांना अक्कल आली असेल, तर त्यांनी आपले कालबाह्य तत्त्वज्ञान फेकून देऊन, व्हिएतनामसारखा प्रगतीचा रस्ता धरला पाहिजे. धर्म ही शेवटी अफूची गोळी आहे. ती गोळी घेऊन कोणताही फायदा होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.