प्रत्येक चित्रपट हा समाजाला संदेश देण्यासाठी बनवलेला नसतो, काही चित्रपट हे….; अभिनेत्री चित्रांगदा सिंगचे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

Chitrangada Singh : हाऊसफुल ५ चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटाने आतापर्यंत शंभर कोटींहून अधिकची कमाई केली आहे, असे असले तरीही काही प्रेक्षकांनी या चित्रपटाला नापसंती दर्शवली आहे. आता सोशल मीडियावरून या चित्रपटातील काही सीन्समधील दृश्य आणि डॅायलॅागचे मीम्स करून ट्रोल केले जात आहे.
या टीकेला या चित्रपटातील अभिनेत्री चित्रांगदा सिंगने सडेतोड उत्तर दिले आहे. अशा चित्रपटांकडे एकाच चष्म्यातून पाहणे योग्य नसल्याचे चित्रांगदा म्हणाली आहे. ‘मला वाटतं प्रत्येक चित्रपट वेगळ्या संवेदनशीलतेने बनवला जातो. त्याचा विनोद वेगळा असतो, त्याचा टोन वेगळा असतो. मग त्यातले संवाद असोत किंवा विनोद असोत.
‘जाने भी दो यारो’ असो, किंवा ‘हेरा फेरी या प्रकारचे चित्रपट बनवले गेले आहेत आणि प्रेक्षकांना या चित्रपटांनी खळखळून हसवले आहे. विनोदात बऱ्याच गोष्टी हलक्यात घेतल्या जातात. प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. यामुळे प्रत्येक चित्रपटाचा उद्देश हा समाजाला संदेश देणारा नसतो, असे सडेतोड उत्तर तिने ट्रोल करणाऱ्यांना दिले आहे.
अक्षय कुमारचा ‘एअरलिफ्ट’, ‘पॅडमॅन’, ‘केसरी’ यांसारखे चित्रपट समाजाला संदेश देणारे आहेत. मात्र, प्रत्येक चित्रपट हा समाज्याला संदेश देण्यासाठी बनवलेला नसतो, काही चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी बनवले जातात, असे प्ररखड मत तिने व्यक्त केले आहे.





