Politics News : बिहारच्या राजकारणात रविवारी एका मोठ्या सत्तांतराचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १४ एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक बोलावली असून, त्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. (Politics News) गेल्या आठवड्यात राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर नितीश कुमार आता राज्याच्या राजकारणातून निरोप घेत असून, बिहारमध्ये प्रथमच भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कॅबिनेट सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही बैठक मंगळवारी सकाळी ११ वाजता पार पडेल. या बैठकीनंतर नितीश कुमार राजभवनात जाऊन राज्यपाल सय्यद अता हसनैन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Politics News) जेडीयूचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय कुमार झा यांनीही १३ एप्रिलनंतर नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल, असे स्पष्ट करून या बदलावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यात प्रथमच आपला मुख्यमंत्री बसवण्यासाठी भाजपने अत्यंत सावध आणि नियोजित पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. अनेक इच्छूक मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बिहारच्या सर्वोच्च खुर्चीसाठी सध्या उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, राजकीय गणिते पाहता भाजपकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सम्राट चौधरी हे कोइरी समाजाचे असून, त्यांच्या नियुक्तीमुळे नितीश कुमार यांनी तयार केलेले लव-कुश (कुर्मी-कोइरी) हे समीकरण एनडीएच्या बाजूने टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. (Politics News) दुसरीकडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचे नावही चर्चेत आहे. राय हे यादव समाजाचे असून, त्यांच्या माध्यमातून आरजेडीच्या पारंपरिक व्होट बँकेला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. याशिवाय दलित चेहरा म्हणून लखेंद्र पासवान आणि तरुण नेतृत्व म्हणून श्रेयसी सिंह यांच्या नावांचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील प्रयोगांप्रमाणेच बिहारमध्येही एखादे धक्कादायक नाव समोर येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Politics News)