“जणू रामनवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच झालीय की काय असे वाटते’, जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

ठाणे – “जणू रामनवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच झालीय की काय असे वाटते,’ असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या प्रकरणी भाजपच्या वतीने निदर्शने करत अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने काल घाटकोपरमध्ये एक शिबिर झाले. या शिबिरात जितेंद्र आव्हाडांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
शिबिरात आव्हाड म्हणाले की, औरंगाबादला दंगल झाली. आता रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव दंगलीसाठीच झालाय की काय असे वाटते. यंदाचे वर्ष जातीय दंगलीचे आहे. कारण हे नोकऱ्या देऊ शकत नाहीत. भाव कमी करू शकत नाहीत. राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाहीत. राजकीय अवमूल्यन झालेले आहे. सगळ्या बाजूंनी उतार लागलेला आहे. सर्वात सोपे काय आहे, असे धार्मिक सोहळे करा. त्या सोहळ्यातून मते जमा करा. नाहीच जमले, तर आग लावून टाका. आव्हाडांच्या याच वक्तव्यावरून आता भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे.
कारवाईकडे लक्ष
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत आज अंधेरी पोलिस ठाण्यासमोर भाजपने निदर्शने केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. भाजपच्या वतीने तशी तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. आता यावर पोलिस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.





