जामखेड निवडणुकीत नवा ट्विस्ट..! ‘या’ उमेदवाराने शेवटच्या ५ मिनिटात घेतला अर्ज माघारी; राष्ट्रवादीला दिला पाठींबा

जामखेड : जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत रोज नव्याने समीकरण समोर येत असताना आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी नवा ट्विस्ट समोर आला आहे. आम आदमी पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी दावेदार असणाऱ्या रहिमुन्नीसा कमाल शेख यांनी ऐनवेळेस शेवटच्या ५ मिनिटात आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या शहाजी राळेभात यांना पाठींबा जाहीर केला. त्यामुळे नवे समीकरण तयार झाले आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणूक जाहीर झाल्यापासूनच लक्षवेधी ठरत आहे, यामध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट ) शिवसेना (शिंदे गट ), काँग्रेस उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते उमेदवारी अर्ज काढण्यापर्यंत लक्षवेधी राहिलेली आहे. आज अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केल्यापैकी कोण अर्ज मागे घेणार यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
यातच अनेक ठिकाणी बंडखोरी होणार हे दैनिक प्रभातनेही वृत्ताच्या माध्यमातून लिखाण केले होते. त्याप्रमाणे अनेक अपक्षांनी अर्ज माघारी घेतले नाही. मात्र त्याचा फटका पक्षांना बसणार आहे. त्यातच आम आदमी पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी दावेदार असणाऱ्या रहिमुन्नीसा कमाल शेख यांनी अर्ज दाखल केल्यापासून नारळ वाढवून प्रचारास जोरदार सुरुवात केली होती. मात्र आज अर्ज माघारी घेण्याचा दिवशी शेवटच्या ५ मिनिटात अर्ज माघारी घेतला व त्यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) संध्याताई शहाजी राळेभात यांना जाहीर पाठींबा दिला.
त्यामुळे अनेकांना धक्का बसला. रहिमुन्नीसा कमाल शेख यांनी उमेदवारी अर्ज ठेवण्यासाठी अनेक बड्या ऑफर देण्यात आल्या होत्या. मात्र ते कोणत्याही अमिषाला बळी न पडत आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्याचे चिरंजीव असिफ शेख यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याचे जाहीर केले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादीचे नेते मंगेश आजबे, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.





