मुंबई – परप्रांतीयांच्या मुद्द्यावर आतापर्यंत आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता त्यांच्या इंजिनाची दिशा बदलल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यांनी आता हिंदुत्व या आपल्या मुळ मुद्द्याकडे पुन्हा मोर्चा वळवला आहे. राज ठाकरे यांनी भूमिका बदलल्यानंतर भाजपच्या विविध नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
या संभाव्य युतीमुळे राजधानी मुंबईतील हालचाली गतिमान झाल्या आहेत व तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यातील बऱ्याच बातम्या पतंगबाजी स्वरूपाच्या असल्या तरी मनसे-भाजप एक होणार याबाबत सध्या तरी दुमत नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेल्या भाजपला रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू असून अद्याप याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
येत्या काळात मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील अनेक मोठ्या महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे. या निवडणुका राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्रिपणे लढल्यास दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळणार का, यावर आता पक्षनेतृत्वाकडून अंदाज घेतला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी व्यक्तीगत पातळीवर अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र असे असले तरी राजकारणात हे दोन्ही परस्परांचे कट्टर विरोधकच होते. आतापर्यंत झालेल्या निवडणुका अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव झालेल्या सभांमध्ये बाळासाहेबांचा पवारांवरच कायम निशाणा असायचा, तर पवारही त्यांच्या मुरब्बी शैलीत बाळासाहेबांना प्रत्युत्तर द्यायचे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पारंपरिकदृष्ट्या एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले आहेत.
स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा संघर्षही झाला आहे. त्यामुळे युती झाल्यास दोन्ही पक्षांची मते एकमेकांकडे वळणार की नाही, याबाबत आता पवार आणि उध्दव ठाकरे यांच्याकडून चाचपणी केली जात असल्याचे समजते. पवार आणि उध्दव यांच्यात असलेले अंडरस्टॅंडींग गेल्या अडीच वर्षात दिसून आले आहे. उध्दव यांचे खासमखास संजय राऊत यांनीही एकत्र येण्याची शक्यता सूचित केली आहे. आतापर्यंत युतीत एकत्र असताना सेनेला मुंबई महापालिक सोपी गेली होती. मात्र आता मनसे भाजपच्या गळाली लागली आहे आणि राज यांचा करिश्मा या दोन्ही बाबींमुळे सेनेसमोर आव्हान उभे राहू शकते. त्यामुळेही फेरजुळणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
दुरंगी लढतच होणे अपेक्षित
राज -भाजप भेटींना जोर; पवार- उध्दव यांचीही चर्चादरम्यान, राज्यात कॉंग्रेस हा तिसरा पक्षही महाविकास आघाडीत अत्यंत मर्यादीत भूमिकेत आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक विधाने करत असतात त्यामुळे अधुनमधुन हा पक्ष चर्चेत असतो. अन्यथा तो आघाडीतील लुप्त घटक आहे. स्वत: पटोले यांनी पद स्विकारल्यापासून स्वबळाची भाषा वारंवार बोलून दाखवली आहे. मात्र त्यानंतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस भूईसपाट झाली आहे. शिवाय पक्षात नेतृत्वाचीच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिल्लीतील अजुन या पक्षाला सावरता आलेले नाही तर महाराष्ट्रातील निर्णय केव्हा आणि कोण घेणार हा गोंधळ आहेत. त्यामुळे तूर्तास कॉंग्रेसला काठावर ठेवत आपणच एकत्र लढलेले बरे असा विचार जर सेना आणि राष्ट्रवादीने केला तर त्यात त्यांची चूक नाही. एका अर्थाने भाजप- मनसे व शिवसेना- राष्ट्रवादी अशी दुरंगी लढतच प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.