“राजद हा लोकशाही पक्ष नाही, पण…” ; गिरीराज सिंह यांचा लालू अन् तेजस्वी यादवांवर हल्लाबोल

Giriraj Singh on RJD । बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरून राजकीय खळबळ उडाली आहे. राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीदेखील झडत आहेत. या भागात, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि त्यांच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला आहे.
गिरीराज सिंह यांनी त्यांच्या संसदीय मतदारसंघ बेगुसराय याठिकाणी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी,”आरजेडी हा लोकशाही पक्ष नसून एक कुटुंब कंपनी आहे” असे म्हणत त्यांच्यावर हल्लबोल केला. ते पुढे म्हणाले, “आरजेडी ही टाटा-बिर्लासारखी कंपनी बनली आहे, जिथे एमडी आणि सीएमडी फक्त कुटुंबातील सदस्य आहेत. लालू यादव या पक्षाचे सीएमडी आहेत आणि तेजस्वी यादव त्याचे कार्यकारी एमडी आहेत.”
तसेच ,”लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी, त्यांची मुलगी आणि अनेक नातेवाईक पक्षात महत्त्वाची पदे भूषवतात. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की आरजेडी हा एक पक्ष आहे जो पूर्णपणे कुटुंबाच्या सूचनेनुसार चालतो” असे म्हणत यादव कुटुंबावर निशाणा साधला.
लालू यादव यांनी बिहारला ‘शेफर्ड स्कूल’ बनवले Giriraj Singh on RJD ।
बिहारला स्कॉटलंडसारखे बनवण्याच्या तेजस्वी यादव यांच्या बोलण्यावरही गिरिराज सिंह यांनी टीका केली. त्यांनी याविषयी बोलताना,”लालू यादव यांनी आधी बिहारला ‘शेफर्ड स्कूल’ बनवले होते आणि आता तेजस्वी ते स्कॉटलंड बनवण्याबद्दल बोलत आहेत.” असे म्हणत टीका केली. त्यांनी असा दावा केला की,आता बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि आयआयटी सारख्या संस्था उघडत आहेत, ज्यामुळे राज्याचा विकास होत आहे. ” गिरीराज म्हणाले की, “जनतेने आता गोंधळ घालणाऱ्यांना, फक्त गरिबांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना नाकारले आहे.”
गिरीराज सिंह यांनी बिहार बंदवरही हल्लाबोल Giriraj Singh on RJD ।
बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सुधारणा मोहिमेबाबत विरोधी पक्षांनी बुधवारी बिहार बंदची हाक दिली होती. भाजपनेही यावर विरोधकांना फटकारले आहे. भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी या बंदला पूर्णपणे अपयशी ठरवले आणि म्हणाले की राजद आणि काँग्रेसकडे कोणताही ठोस मुद्दा नाही. त्यांनी आरोप केला की विरोधी पक्ष फक्त बिहारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शाहनवाज हुसेन म्हणाले की, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव सारखे नेते रस्त्यावर उतरून स्कूल बस, रुग्णवाहिका आणि गाड्या थांबवत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीसारख्या घटना घडल्या, ज्यामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे. ते म्हणाले की, विरोधकांना निवडणुका हरण्याची भीती आहे, म्हणून ते निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.





