यवत : दौंड तालुक्यातील वरवंड-पारगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक म्हणजे मोठी काटे की टक्कर होती. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई मनाली जात होती. मात्र, या गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.गायत्री खळदकर यांनी आमदार राहुल कुल यांचे खांदे समर्थक असणाऱ्या भाजपच्या सारिका दिवेकर यांचा प्रचंड मोठ्या मताधिक्य मिळवून दारुण पराभव केला. या वरवंड-पारगाव गटाच्या निवडणुकीची सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. याठिकाणी सारिका दिवेकर या स्थानिक पातळीवरील आणि डॉ. गायत्री खळदकर यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक या गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत वातावरण दोनही गटाकडून चांगलेच ढवळून निघाले होते. ते मतदान होईपर्यंत चांगलेच गरम वातावरण वरवंड पारगाव गटात होते. त्यानंतर मतदानानंतर मतमोजणीपर्यंत कोण विजयी होते आणि किती मतांनी आघाडी आणि पिछाडीवर राहिलं याच्याच चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. गायत्री विशाल खळदकर, भाजपाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दिवेकर यांच्या पत्नी सारिका दिवेकर, तसेच शिवसेनेकडून मानसी ताकवणे आणि योगिनी दिवेकर या उमेदवार मैदानात होत्या. चारही उमेदवारांनी जोरदार प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला. घराघरांत भेटी, कोपरा सभा, पदयात्रा, महिला मेळावे यामुळे निवडणूक रंगतदार झाली होती. मात्र प्रत्यक्ष लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. गायत्री खळदकर आणि भाजपच्या सारिका दिवेकर यांच्यातच रंगली. दोन्ही बाजूंनी मोठी ताकद लावण्यात आली होती. अखेर झालेल्या मतमोजणीत डॉ.गायत्री खळदकर यांनी १५,१७६ मते मिळवत सारिका दिवेकर यांच्यावर मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. तसेच वरवंड गणातील निवडणूकही तितकीच चुरशीची ठरली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदीप किसनराव दिवेकर, तर भाजपकडून तुषार रामदास दिवेकर यांच्यात थेट सामना झाला. दोन्ही उमेदवारांची गावागावांत मजबूत पकड असल्याने ही लढत अत्यंत लक्षवेधी ठरली. मतमोजणीनंतर प्रदीप दिवेकर यांनी ७,७८५ मते मिळवत विजय मिळवला. विकासकामांमुळे विजय प्रदीप दिवेकर हे अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामविकास कामांमध्ये सक्रिय असल्याने मतदारांनी त्यांच्या कार्याला पसंती देत त्यांच्यावर विश्वास दाखवला. गावातील पाणी, रस्ते, स्वच्छता, शाळा आणि सार्वजनिक सोयीसुविधांसाठी त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचा लाभ त्यांना या निवडणुकीत मिळाल्याचे बोलले जात आहे. विजयानंतर झालेल्या सभेत डॉ. विशाल खळदकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानत, ‘हा विजय माझा नसून संपूर्ण ग्रामस्थांचा आहे. विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. वरवंडकरांसाठी सदैव उपलब्ध राहीन,’ असे आश्वासन दिले. विजयी उमेदवार प्रदीप दिवेकर यांनीही आपल्या भाषणात गट व गणातील नागरिकांचे आभार मानून, ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत सर्वसामान्यांची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. जनतेने दाखवलेला विश्वास विकासकामांतून सार्थ ठरवू’ असे सांगितले.