पूरग्रस्तांसाठी सर्व मंत्री एक महिन्याचा पगार देणार; ‘या’ पक्षाचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. पक्षाच्या या एकत्रित उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी केली. पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
अनेक शेतकऱ्यांचं पिक वाहून गेलं आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत. तसेच सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले.





