प्रभात वृत्तसेवा पुणे : नवले पुलावरील प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी पुणे – बेंगलोर महामार्गावरील महापालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील चार सेवा रस्त्यांचे भूसंपादन पुढील सहा महिन्यांत करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. या रस्त्यांमुळे लहान वाहनांची महामार्गावरील वर्दळ कमी होणार आहे. याशिवाय, हा रस्ता महापालिका, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्याने या तिन्ही विभागांकडून केल्या जात असलेल्या कामांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारीही महापालिकेने घेतली असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पृथ्वीराज बी.पी, पवनीत कौर पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर उपस्थित होते. आयुक्त म्हणाले की, या महार्मागाच्या कडेने मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. त्यामुळे, या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. हा महामार्गबालेवाडीपासून ते जांभूळवाडीपर्यंत दोन्ही बाजूंनी २२ किलोमीटर अंतर महापालिकेतून जातो. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही सेवा रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. यात तीन ठिकाणी सेवा रस्त्यासाठी भूसंपादन तसेच तो करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यात राधा चौक ते सूस खिंड, डुक्कर खिंड ते वारजे आणि वडगाव पूल ते नवले पूल या सेवा रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन तातडीनं करून तसेच या रस्त्यांचे मार्किंग करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. या कामासाठी ६ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून या रस्त्यावर अनधिकृत पार्किंग तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. वेगावर मर्यादा आणणार ? या महामार्गावर शहराची हद्द तसेच गावांचा परिसर असल्यास ताशी ८० किमी वेगाची सरासरी मर्यादा आहे. मात्र, नवले पुलावर होणारे अपघात लक्षात घेऊन कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलाच्या परिसरापर्यंत ही वेग मर्यादा ताशी ६० किमी करण्यात आली आहे. मात्र, त्यात आता आणखी वेग कमी करण्याबाबत महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस तसेच महामार्ग प्राधिकरणाशी चर्चा करून वेग मर्यादा कमी करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.