National Sports Day : खेलेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया
पढोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कुदोगे बनोगे खराब... असे पूर्वी म्हणायचे. केवळ अभ्यास केला आणि चांगले शिक्षण घेतले तर आयुष्यात यश आणि सन्मान मिळतो.

National Sports Day : पढोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कुदोगे बनोगे खराब… असे पूर्वी म्हणायचे. केवळ अभ्यास केला आणि चांगले शिक्षण घेतले तर आयुष्यात यश आणि सन्मान मिळतो. खेळण्यात वेळ घालवला, की या गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकत नाहीत, असे याद्वारे सांगितले गेले आणि बराच काळ ते मुलांच्या मनावर बिंबवले गेले. तथापि, आजच्या काळात ही विचारसरणी पूर्णत: बदलली आहे.
खेळांना करिअर, फिटनेस, नाव आणि पैसा कमावण्याचे साधन आता मानले जाऊ लागले आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर असोत वा सायना नेहवाल किंवा पी. व्ही. सिंधू यांना मिळालेले भव्य यश खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यात महत्त्वपूर्ण ठरले. देशात आज असे असंख्य खेळाडू विविध खेळांत आपले नैपुण्य सिद्ध करत केवळ त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे, तर त्यांच्या शाळेची, राज्याची आणि देशाचीही शान जगभरात वाढवत आहेत.
खेळ हे केवळ करमणूक किंवा विरंगुळ्याचे साधन नाही, तर मानवी जीवनाला शिस्त, दिशा आणि आरोग्य देणारी ती एक जीवनशैली आहे. मैदानावर घालवलेला प्रत्येक क्षण माणसाला आयुष्यात येणार्या चढ-उतारांना सामोरे जाण्याची ताकद देतो. दुर्दैवाने, आजच्या डिजिटल युगात मैदानी खेळ पुन्हा एकदा मागे पडत चालताना दिसत आहेत.
मुले तासन्तास लॅपटॉप, आयपॅड अथवा मोबाइलसमोर ध्यानस्थ असतात. सगळ्या जगाचा त्यांना विसर पडतो, अशी त्यांची या उपकरणांसमोर समाधी लागलेली असते. तथापि, स्वत:ला असे आभासी जगात गुंतवून ठेवत त्यातच हरवून जाणे त्यांच्या भविष्यासाठी निश्चितच मारक आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी जागरूकपणे प्रयत्न करावे लागणार आहेत.
कोणत्याही खेळात सहभाग घेतल्यामुळे शरीर सुदृढ होते. धावणे, उड्या मारणे किंवा कोणताही मैदानी खेळ खेळल्याने हृदयाचे आरोग्य उत्तम राहते, स्नायू बळकट होतात आणि शरीराची सहनशक्ती- प्रतिकारशक्ती वाढते. नियमित खेळणार्या व्यक्तीला थकवा जाणवत नाही आणि रात्री शांत झोप लागते.
त्याचे मन कायमच सकारात्मक राहते आणि तो येणार्या परिस्थितीला अगदी संतुलितपणे आणि परिपक्वतेने हाताळण्यास सक्षम होतो. खेळताना मेंदूमध्ये एंडॉर्फिनसारखी आनंददायी रसायने स्रवतात, ज्यामुळे चिंता आणि मानसिक तणाव कमी होतो, असे डॉक्टर सांगतात ते काही खोटे नाही. केवळ एवढेच नाही तर खेळांमुळे एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढते.
खेळांची मैदाने ही आयुष्याची पाठशाळा आहे. येथे जिंकण्याचा आनंद जसा अनुभवता येतो, तसेच पराभवातून शिकण्याची संधीही मिळते. मुळात पराभव होऊ शकतो व तो कसा स्वीकारायचा याची तयारीच खेळांमुळे होते. पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या उत्साहाने उभे राहण्याची वृत्ती केवळ खेळच शिकवू शकतात. खेळांमुळे संघभावना वाढीस लागते आणि सहकार्यांना सोबत घेऊन चालण्याचे नेतृत्वगुणही विकसित होतात.
थोडक्यात काय, तर खेळ माणसाला केवळ तंदुरुस्त ठेवत नाहीत, तर त्याला महत्त्वाकांक्षी आणि जबाबदार नागरिकही बनवतात. आजच्या काळात खेळांकडे केवळ छंद म्हणून न पाहता, एक उत्तम करिअरचा पर्याय आणि आरोग्यदायी भविष्याची गुंतवणूक म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. हा एक सकारात्मक बदल आहे. प्रत्येक मुलाने आणि नागरिकाने दररोज थोडा वेळ मैदानावर घालवणे ही काळाची गरज आहे.
भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. त्यांच्या अलौकिक योगदानाची आठवण म्हणून 2012 पासून हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडादिनाच्यानिमित्ताने सर्वच वयोगटातील मुला-मुलींना पुन्हा एकदा जगण्यातील पॉझिटिव्हीटीचे स्मरण करून देण्यासाठी दैनिक प्रभातने ही विशेष पुरवणी आपल्या हातात दिली आहे.
यात दिग्गजांचे विचार आणि त्यांना मिळालेल्या आभाळाएवढ्या यशाचा पुन्हा एकदा उत्सव साजरा केला जाणारच आहे, त्यासोबतच जिद्दीने आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करणार्या नवोदित खेळाडूंना, त्यांना पैलू पाडणार्या त्यांच्या द्रोणाचार्यांना आणि त्यांना संधीची अमर्याद दारे खुली करण्यासाठी धडपडणार्या संस्था- संघटनांनाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या पुरवणीत करण्यात आला आहे… खेलेगा इंडिया… तभी तो बढेगा इंडिया!






