Nasrapur Case: मृत्युदंड की जन्मठेप? महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज निकाल
Nasrapur Case: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक तपास; केवळ दोन महिन्यांच्या आत खटल्याचा निकाल लागणार.

Nasrapur Case – नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने गुरुवारी (दि. २५) दोषी ठरविले. कांबळे याला मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा होणार, याचा निकाल उद्या (दि. २९) लागणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात हा निकाल होणार आहे. १ मे रोजी ही घटना घडली होती. घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या आदेशाने जलतगतीने चाललेल्या या खटल्याचा निकाल दोन महिन्यांच्या आत लागणार आहे. या खटल्यात २० जूनला अंतिम युक्तिवाद पुर्ण झाल्यानंतर गुरुवारी (२५) न्यायालयाने दोषी ठरवले आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १२ न्यायनिवाड्यांचा संदर्भ देत युक्तिवाद केला.
मूळ फिर्यादी यांच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग आणि ॲड. मयूर दोडके यांनी युक्तिवाद केला. बचाव पक्षातर्फे ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी बाजू मांडली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी जलतगतीने तपास करत १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले होते, तर सरकारी वकिलांनी १६ दिवसांत ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. या प्रकरणात उद्या काय निकाल लागणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.




