‘मी प्रार्थना करतो की…’, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भक्कम पाठिंबा देणाऱ्या नामदेव शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया

Namdev Shastri | बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आले आहे. देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर अखेर मुंडेंकडून मंत्रीपदाचा राजीनामा देण्यात आला . मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर आता यावर भगवानगडचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी मुंडेंना भक्कम पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता त्यांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळायला हवी, असे मत व्यक्त केले आहे.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्याविषयीचे माझे वक्तव्य हे अजाणतेपणातून होते. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार गडावर आले, तेव्हा त्यांनी मला याची जाण करून दिली. तेव्हा या क्रूरतेची जाणीव मला झाली. तेव्हा माझेही अंतःकरण दुखावले. आरोपींचं समर्थन कोणीही करत नाही.
मी न्यायालयाला प्रार्थना करतो की आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी. भगवान गड नेहमीच पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे. असे नामदेव शास्त्री म्हणाले.
दरम्यान, याआधी हत्या प्रकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे शास्त्री यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. ‘धनंजय मुंडे हे खंडणी घेऊन जगणारे नाहीत. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे. पक्षाचे नेत्यांनाही याची जाणीव आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवली? कारण की, त्यांना अगोदर जी मारहाण झाली आहे ती पण दखल घेण्याजोगी आहे. असं मला वाटतं.’ अशा आशयाचे वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती.





