Nagpur Airport News : “नागपूर विमानतळ विकासाचे इंजिन म्हणून नावारूपाला येणार” – देवेंद्र फडणवीस
नागपूर विमानतळ हे नागपूर, विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून नावारूपाला येईल.

Nagpur Airport – नागपूर व परिसरात मेन्टेनन्स कमांड, ऑटो एव्हिएशन आणि डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे.
या उद्योगांसह कृषी, पर्यटन आदींच्या विकासाला गती मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ हे नागपूर, विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत नागपूर विमानतळाच्या हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, देशात नवनवीन विमानतळ उभारले जात असताना नागपूर विमानतळ मोठे व सुंदर करण्याचा आम्ही संकल्प केला. २०१८ मध्ये यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या. २०१९ मध्ये जीएमआर कंपनी पात्र ठरली होती.
मात्र या संदर्भात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आणि अखेर सकारात्मक निर्णय आला. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा दिला व केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पास मंजुरी दिली आणि आज रीतसरपणे या विमानतळाच्या आधुनिकीकरण, विस्तार आणि विकासाच्यादृष्टीने जीएमआर कंपनीला विमानतळ हस्तांतरण करण्यात आले आहे.
या विमानतळावर प्रवासी व कार्गो वाहतूक होण्यासाठी दोन टर्मिनल आणि दोन धावपट्ट्या होणे गरजेचे आहे. हस्तांतरणांमुळे आता हा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानतळाला मेट्रो ट्रेन आणि रस्त्यांची उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.
विमानतळाचा विस्तार लक्षात घेऊन येत्या काळात सुयोग्य कनेक्टिव्हिटी देण्याच्या दिशेनेही समांतर कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिले एरोट्रोपोलिस म्हणून उदयास येईल :
नागपूर हे भारतातील पहिले एरोट्रोपोलिस म्हणून उदयास येऊ शकते आणि देशातील देखभाल आणि दुरुस्ती हब स्थापन करण्यासाठी हे सर्वात योग्य ठिकाण आहे.
गेल्या 12 वर्षांत देशाने विमान वाहतूक क्षेत्रात जी प्रगती साधली आहे ती केवळ सुरुवात आहे, कारण मोठी वाढ होण्याची वाट पाहत आहे.
एरोट्रोपोलिस हा महानगराचा उप-प्रदेश आहे ज्याच्या पायाभूत सुविधा, जमिनीचा वापर आणि अर्थव्यवस्था विमानतळावर केंद्रित आहे. आजचा दिवस नागपूरसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे आणि सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे.
सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ औपचारिकपणे सीएमआरकडे सुपूर्द केले जात आहे, असे नायडू म्हणाले.





