प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रवासात एसटी बस बंद पडल्यास त्या मार्गावरून धावणाऱ्या कोणत्याही (आरामदायी वातानुकूलित, निमआराम, साधी) बसमध्ये प्रवाशांना विनाशुल्क व तातडीने पर्याय उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. शिवशाही, ई-शिवाई, शिवनेरी बसमध्ये प्रवेश नाकारल्यास, फरकाच्या पैशासाठी अडवणूक केल्यास संबंधित वाहक-चालकांवर कठोर कारवाईचा आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभाग नियंत्रकांंना दिला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार असून, बससाठी जास्तवेळ वाट पहावी लागणार नाही. एसटी प्रवासात काहीवेळा तांत्रिक कारणामुळे बस बंद पडण्याच्या घटना घडतात. विशेषत: जुन्या झालेल्या लालपरी, शिवशाही बस बंद पडण्याच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाली आहे. काहीवेळेस निर्मनुष्य ठिकाणी तसेच वाहतूक कमी असलेल्या आडरानात नियमित साधी बस बिघडल्यास लुटीचा, चोरीचा तसेच जिवाला धोका असतो. एसटी बंद पडल्यास पुढचा प्रवास कसा करायचा? असा प्रश्न पडतो. एसटी महामंडळाने मुभा दिलेली असतानाही शिवशाही, ई-शिवाई बसचे वाहक प्रवेश नाकारत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. नव्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्यामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बिघाड झाल्यास अथवा अपघात झाल्यास प्रवाशांना त्याच तिकिटावर त्याच मार्गावर धावणाऱ्या अन्य एसटी बस तसेच उच्च श्रेणीची असली तरी त्यातून त्याच तिकिटात प्रवास करता येणार आहे. या सुधारित निर्णयानुसार कोणताही अधिकचा आकार, प्रवासभाडे फरक, आकारणी करू नये, असे निर्देश राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिले आहेत.