MPSC Paper Leak : “एमपीएससी पेपर फोडणाऱ्यांना ठोकून काढू”; ‘या’ नेत्याने दिला इशारा
राज्यभरात प्रचंड वादळ उठवणाऱ्या एमपीएससी पेपरफुटी (MPSC Paper Leak) प्रकरणावर अखेर राज्य सरकारचा संताप बाहेर आला आहे.

MPSC Paper Leak : राज्यभरात प्रचंड वादळ उठवणाऱ्या एमपीएससी पेपरफुटी (MPSC Paper Leak) प्रकरणावर अखेर राज्य सरकारचा संताप बाहेर आला आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले असतानाच, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आरोपींना थेट भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे.
“या प्रकरणातील दोषींना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही; पेपर फोडणाऱ्यांना (MPSC Paper Leak) आम्ही ठोकून काढू आणि पोलिसांमार्फत अशी कडक कारवाई करू की पुन्हा कोणी हे धाडस करणार नाही,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी नंदुरबार येथील पत्रकार परिषदेत घेतला.
परीक्षेतील चूक ही अक्षम्य असून विद्यार्थ्यांचे नुकसान सरकार कदापि सहन करणार नाही, हे स्पष्ट करत त्यांनी एका मोठ्या बदलाचे संकेत दिले. भविष्यात अशा गैरप्रकारांना कायमचा आळा बसावा यासाठी महाराष्ट्र सरकार अशी अभेद्य आणि पारदर्शक सिस्टीम उभारण्याच्या तयारीत आहे, ज्याचा आदर्श देशातील इतर राज्येही घेतील. दोषींच्या मुसक्या आवळण्याचे काम १०० टक्के सुरू असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, याच मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आडून स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या विरोधकांचाही (MPSC Paper Leak) त्यांनी चांगलाच समाचार घेतला. आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत सामंत यांनी कार्यकर्ते दिवसभर घाम गाळून गर्दी जमवतात आणि मोर्चा संपताना एखादा नेता अचानक हजर होऊन झेंडा हातात घेतो; मग सगळी गर्दी आपलीच असल्याचा देखावा उभा केला जातो, असा खोचक टोला लगावला. विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळून कोणीही आपले राजकीय दुकान चालवू नये, असा सज्जड दमही त्यांनी दिला.





