तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रवीण मोर्चाले यांनी आयुष्मान खुरानाच्या “बाला’ चित्रपटाचे लेखक आणि निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात कथा चोरिच्या आरोपावरुन खटला दाखल केला आहे. लेखक निरेन भट्ट आणि “बाला’ची निर्माती संस्था मॅडॉक फिल्म्सने आपली पटकथा उचलली असल्याचा दावा प्रवीण यांनी केला आहे.
स्वामित्त्व हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी लेखक आणि निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. “मी लिहिलेल्या कथेशी बालाची कथा ही साधर्म्य दाखवणारी आहे.
2007 साली मी या कथेची चित्रपट लेखक संघटनेकडे नोंदणी केली होती. मी चित्रपटाच्या कथेवर दोन वर्षे मेहनत घेतली. मी खात्रीलायक सुत्रांकडून माहिती घेतली आहे. मी लिहिलेल्या कथेशी बालाची कथा मिळती जुळती आहे’ असे प्रवीण यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मी या चित्रपटाच्या संबधीत एकाही व्यक्तीला भेटलो नाही. पण 2005 पासून या चित्रपटाची कथा मी अनेक लोकांना ऐकवली आहे.
या कथेचे स्वामित्त्व हक्क माझ्याकडे आहेत त्यामुळे कोणीही माझ्या परवानगीशिवाय या कथेचं अनुकरण करु शकत नाही. हा स्वामित्त्व हक्क कायद्याचा भंग आहे असंही ते म्हणाले.