Monsoon Update: मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; तारीख समोर, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
Monsoon Update:

Monsoon Update: राज्यात जून महिना सुरू होऊन अनेक दिवस झाले तरी अद्याप पाऊस झालेला नाही. मॉन्सून राज्यात दाखल झाला नसल्याने अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्याची चिंता देखील अधिक वाढली आहे.
मॉन्सूनच्या प्रगतीला पोषक हवामान प्रणालींचा अभाव हे लांबण्यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे. अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावल्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सूनची आगेकूच गेल्या काही दिवसांपासून थांबली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र आता लवकरच मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Vidhan Parishad Election : राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान; कोणाचे पारडे जड?
२५ जून ते १ जुलै दरम्यान मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या ८ दिवसांत म्हणजे, २५ जून ते १ जुलै यादरम्यान मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
आज रायगड, रत्नागिरी, पुणे, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येलो अलर्ट जारी केला आहे.
या भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर उर्वरित भागांत उकाड्याचा त्रास कायम असणार आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, मात्र व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
बळीराजाची चातकासारखी आभाळाकडे नजर
दरम्यान, अनेक गावांमध्ये काही ठिकाणी केवळ किरकोळ सरी कोसळल्या मात्र हा पाऊस पेरणीसाठी अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे शेतकरी रोज सकाळी सायंकाळी चातकासारखी आभाळाकडे नजर लावून बसला आहे. पाऊस लांबल्यामुळे केवळ पेरण्या रखडल्या नाही तर जनावराच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामीण भागातील जलस्रोतांची पाणी पातळी कमालीची खालावली आहे.
दुसरीकडे, मॉन्सून आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा तसेच पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये पुढे सरकला. पुढील चार ते पाच दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
हेही वाचा :
PMC News: खासगी रुग्णालयांची मनमानी! बिलासाठी थेट मृतदेह अडवले; महापालिकेत नगरसेवकांचा संताप






