Asia Cup Trophy : फायनल श्रीलंकेविरुद्ध पण सामना पाकिस्तानशी! महिला आशिया चषकाच्या जेतेपदाआधी जुना ‘ट्रॉफी वाद’ पुन्हा पेटला
Asia Cup Trophy : भारत विरुद्ध श्रीलंका या जेतेपदाच्या लढतीपूर्वी क्रिकेटविश्वात खळबळ उडवून देणारा जुना 'ट्रॉफी वाद' पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Mohsin Naqvi Asia Cup Trophy Row Returns Ahead Of Women Asia Cup 2026 Final : महिला आशिया चषक २०२६ च्या अंतिम फेरीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गतविजेत्या श्रीलंकेशी भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियासमोर विक्रमी आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र, या जेतेपदाच्या लढतीपूर्वी क्रिकेटविश्वात खळबळ उडवून देणारा जुना ‘ट्रॉफी वाद’ पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एसीसीचे आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी १३ सप्टेंबर रोजी दुबईतील या अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
विजेतेपद मिळवूनही टीम इंडिया ट्रॉफीविना मायदेशी; २०२५ मधील तो विचित्र प्रसंग!
गेल्या वर्षी २८ सप्टेंबर २०२५ रोजी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला लोळवत पुरुष आशिया कप जिंकला होता. मात्र, सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे बक्षीस वितरण समारंभ तासाभरापेक्षा अधिक काळ रखडला होता. शेवटी भारतीय खेळाडूंनी ट्रॉफीशिवाय पोडियमवर जल्लोष केला, तर नक्वी ती ट्रॉफी घेऊन स्टेडियमबाहेर पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताने जिंकलेली ती पुरुष आशिया चषक ट्रॉफी अद्यापही दुबईतील एसीसीच्या कार्यालयातच धूळ खात पडून आहे.
नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार का? हरमनप्रीतच्या सेनेसमोर मोठं धर्मसंकट!
एसीसीचे अध्यक्ष या नात्याने महासंघाच्या स्पर्धांमध्ये विजेत्या कर्णधाराला ट्रॉफी प्रदान करण्याचा प्रोटोकॉल आणि अधिकार मोहसिन नक्वी यांच्याकडेच आहे. त्यामुळे आज जर भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा पराभव करून जेतेपद जिंकले, तर हरमनप्रीत कौर आणि तिची पलटण मोहसिन नक्वी यांच्या हातातून ट्रॉफी स्वीकारणार की पुरुष संघाप्रमाणेच नकार देणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भारत-पाक यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा प्रसंग पुन्हा एकदा मैदानावर हायव्होल्टेज नाट्य घडवू शकतो.
बीसीसीआयचे मौन; फायनलच्या निकालावर संपूर्ण जगाचे लक्ष!
या संवेदनशील विषयावर बीसीसीआयने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. सामन्यापूर्वी अनावश्यक वाद किंवा खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून बोर्डाने सध्या तरी मौन बाळगल्याचे समजते. अंतिम फेरीचा निकाल लागल्यानंतर भारतीय संघ आणि बीसीसीआय व्यवस्थापन पोडियमवर नेमकी काय भूमिका घेते आणि नक्वींसमोर टीम इंडियाची भूमिका काय असेल, याकडे आता संपूर्ण क्रीडाजगताचे लक्ष लागले आहेत.





