Mohan Bhagwat : पहलगामसारखे हल्ले रोखण्यासाठी समाजामध्ये एकतेची आवश्यकता; सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले मत

मुंबई : ही लढाई धर्म आणि अधर्म यांच्यातील आहे. आपला देश किती शक्तिशाली आहे हे दाखवून देण्याची आता वेळ आली आहे. आपल्या साऱ्यांच्या हृदयात वेदना आहेत. सारे हिंदुस्थानी पेटून उठले आहेत. वाईटाचा अंत करण्यासाठी आपल्याला ताकद दाखवावी लागेल. असे हल्ले रोखण्यासाठी समाजात एकता आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान समोर आले आहे. या घटनेचा निषेध करताना भागवत म्हणाले की, दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांची हत्या केली. या गोष्टीला त्यांनी कडाडून विरोध केला. भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलतेवेळी, काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी या घटनेला धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई म्हटले.
भागवत यांनी त्यांच्या भाषणात एक उदाहरण दिले की, रावण हा भगवान शिवाचा भक्त होता पण त्याच्याभोवती अशा काही गोष्टी होत्या ज्या स्पष्ट करून सोडवता येत नव्हत्या. म्हणूनच भगवान रामांना त्याला मारावे लागले. मोहन भागवत पुढे म्हणाले की, असे काही लोक आहेत, ज्यांना समजावून सांगून काहीही प्रश्न सुटणार नाही. त्यांना धडा शिकवावाच लागेल, मला आशा आहे की हे लवकरच साध्य होईल.
वाईट हेतू असलेल्यांचे डोळे उपटून टाकावेत
संघप्रमुख म्हणाले की जर आपण एकजूट झालो तर कोणीही आपल्याकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही आणि जर कोणी असे केले तर त्याचे डोळे फोडले जातील. ते म्हणाले की, कोणाचाही द्वेष करणे किंवा शत्रुत्त्व करणे आपल्या स्वभावात नाही, परंतु शांतपणे नुकसान सहन करणे देखील आपल्या स्वभावात नाही. खऱ्या अर्थाने अहिंसक व्यक्तीने बलवान असले पाहिजे. जर ताकद नसेल तर पर्याय नाही, पण जेव्हा ताकद असेल तर ती गरज पडेल तेव्हा दिसली पाहिजे.





