Politics News : मोदींच्या वारसदारावरून भाजपमध्ये खळबळ? खासदाराचा मोठा दावा
Politics News : संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी सरकारमध्ये अंतर्गत बंडाळी सुरू असल्याचा दावा केला आहे. RSS ला अमित शहा नव्हे तर दुसरा वारस हवा असल्याचेही ते म्हणाले.

Politics News : भारतीय जनता पक्ष आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये अंतर्गत बंडाळी सुरू असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करायचे आहेत; मात्र पक्षातील अंतर्गत विरोधामुळे ते शक्य होत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य दिल्ली प्रवेशाबाबत बोलताना राऊत यांनी राष्ट्रीय राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत दिले. “मराठी माणूस उपपंतप्रधान होणार असेल तर आनंद झाला पाहिजे. राष्ट्रीय राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे,” असे ते म्हणाले. मात्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेकदा आपण दिल्लीच्या राजकारणात जाणार नसून महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मोदींना मंत्रिमंडळात फेरबदल करायचा, पण…
राऊत यांच्या दाव्यानुसार, मोदींना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात बदल करायचे आहेत. मात्र भाजप आणि सरकारमधील बंडाळीमुळे हा निर्णय रखडला आहे. केंद्रातील चार प्रमुख जुन्या भाजप नेत्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचा दावाही त्यांनी केला.
“ओरिजनल भाजपच्या चार प्रमुख मंत्र्यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. आधी अमित शहा यांचा राजीनामा घ्या, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे अद्याप मंत्रिमंडळ फेरबदल झालेला नाही,” असे राऊत यांनी सांगितले.
‘RSS ला अमित शहा नव्हे, दुसरा वारस हवा’
राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेबाबतही मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळात उपपंतप्रधानपद निर्माण करण्याची भूमिका संघाची आहे. संघाला मानणाऱ्या एका नेत्याला या पदावर बसवून भविष्यातील पंतप्रधानपदाचा वारस निश्चित करण्याची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
“तो पुढचा वारस असेल. अमित शहा नव्हे. अमित शहा यांचा खेळ संपलेला आहे,” असा दावा राऊत यांनी केला.
अमित शहा ‘पंतप्रधानपदाच्या प्रतीक्षेत’?
अमित शहा स्वतःला ‘प्राइम मिनिस्टर इन वेटिंग’ समजतात; मात्र जनतेत त्यांना तशी स्वीकारार्हता नसल्याचेही राऊत म्हणाले. संघाच्या गोटातील माहितीनुसार, सध्या दिल्लीत सक्रिय नसलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याला उपपंतप्रधान करण्याची चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
देशातील पंतप्रधान आणि गृहमंत्री या दोन्ही महत्त्वाच्या पदांच्या भविष्यातील वारसाचा शोध उपपंतप्रधानपदाच्या माध्यमातून घेतला जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत यांच्या या दाव्यांमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणाबाबत पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. मात्र त्यांनी केलेल्या या दाव्यांवर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया काय येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





