‘वंदे भारत ट्रेन’च्या लोकार्पणाच्या वेळी मोदींचा गेहलोतांना चिमटा; म्हणाले…

जयपूर – राजस्थानला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्घतीने रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. राजस्थानची पहिली वंदे भारत ट्रेन आज सकाळी 11.30 वाजता जयपूरहून दिल्ली कॅन्टसाठी रवाना झाली. या सेमी हायस्पीड ट्रेनला नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.
देशातील 15 व्या वंदे भारतच्या नियमित फेऱ्या 13 एप्रिलपासून अजमेर ते दिल्ली कॅंट दरम्यान होणार आहेत. यावेळी वंदे भारत लोकार्पणाच्या कार्यक्रमात मोदींनी आधीच्या सरकारांवर रेल्वेबाबत राजकारण केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना चिमटा देखील काढला.
गेहलोत सध्या राजकीय संकटातून जात आहेत. त्यानंतरही त्यांनी आज वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनास हजेरी लावली. “गेहलोत यांनी माझ्यावर एक मित्र म्हणून जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असेही मोदींनी यावेळी म्हटले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे राजस्थानचे असून रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही याच राज्यातील आहेत. राजस्थानचे रेल्वे बजेट 2014 पूर्वीच्या तुलनेत आता 14 पट अधिक झाले आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा वेगही दुप्पट झाला आहे, असेही मोदींनी यावेळी म्हटले.
वंदे भारत ट्रेनने जयपूर आणि दिल्लीला जाणे नागरिकांसाठी सुकर होणार आहे. या ट्रेनमुळे राजस्थानच्या पर्यटनालाही मदत होणार आहे. पुष्कर आणि अजमेर शरीफ या धार्मिक ठिकाणी पोहोचणे लोकांना सोपे होणार आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सहावी वंदे भारत ट्रेन आहे.
देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन
जलद गतीपासून ते सुंदर डिझाइनपर्यंत वंदे भारत आकर्षक ठरत आहे, असे मोदी म्हणाले. या ट्रेनचे देशभरातून कौतुक होत आहे. वंदे भारत ही पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे, जी मेड इन इंडिया आहे. ही कॉम्पॅक्ट आणि कार्यक्षम आहे, स्वदेशी सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.





