अशोक गेहलोत यांचा पलटवार,’भारत जोडो यात्रेला मोदी सरकार घाबरले, आरोग्यमंत्र्यांनी आधी पंतप्रधानांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगावे’

नवी दिल्ली – जगभरातील वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही विविध तयारी करत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहिले, ज्यात त्यांनी भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत सांगितले.
आता या पत्रावरून बराच गदारोळ झाला आहे, काँग्रेस नेते सरकारवर आरोप करत आहेत की ते भारत जोडो यात्रेवर नाराज आहेत, त्यामुळेच कोरोनाचे कारण देत हि यात्रा बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या पत्रावर प्रश्न उपस्थित केला असून आरोग्यमंत्र्यांनी आधी पंतप्रधान मोदींना पत्र लिहावे, असे सांगितले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेहलोत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “राजस्थानमधील भारत जोडो यात्रा २१ डिसेंबरला सकाळी पूर्ण झाली, परंतु भाजप आणि मोदी सरकार येथे जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला इतके घाबरले आहे की केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी राहुल गांधी यांना राजस्थानमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी पत्र लिहिले आहे. यावरून स्पष्टपणे दिसून येते की वाढत्या जनसमर्थनाच्या भीतीने भारत जोडो यात्रेला अडथळा आणण्याचा भाजपचा हेतू आहे.”
पीएम मोदींच्या रॅलीचा संदर्भ देत अशोक गेहलोत यांनी लिहिले की, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी त्रिपुरामध्ये रॅली काढली जिथे कोविड प्रोटोकॉलचे पालन केले नाही. कोविडच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधानांनी बंगालमध्ये मोठ्या रॅली केल्या. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे उद्दिष्ट राजकीय नसेल आणि त्यांची चिंता रास्त असेल, तर त्यांनी पहिले पत्र पंतप्रधानांना लिहायला हवे होते.
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी पत्र लिहिले होते, या पत्रानंतर काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला करत सरकार राजकारण करत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, भारत जोडो यात्रेने भाजपला हादरा बसला आहे. हे सर्व लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केले जात आहे.





