अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची सरकारवर टीका
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर मागील काही दिवसांपासून टीकास्त्र उगारले आहे. त्यातच आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर जोरदार टीका केली. मंदीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेचे पुढे काय करायचे, याबद्दल मोदी सरकार पूर्णपणे अनभिज्ञ असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली.
Modi & his dream team of economic advisors have literally turned the economy around.
Earlier:
GDP: 7.5%
Inflation: 3.5%Now:
GDP: 3.5%
Inflation: 7.5%The PM & FM have absolutely no idea what to do next. #Budget2020
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 29, 2020
येत्या शनिवारी पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडण्यात येणार आहे. निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतील. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आर्थिक सल्लागारांनी अर्थव्यवस्था उलट्या दिशेने नेली आहे. पूर्वी विकासदर 7.5 टक्के होता आणि चलनवाढीचा दर 3.5 टक्के. आता विकासदर 3.5 टक्क्यांवर आला आहे आणि चलनवाढीचा दर 7.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोघांनाही आता पुढे काय करायचे याची काहीही माहिती नाही. ते दोघेही याबाबत अनभिज्ञ आहेत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
देशातील आर्थिक मंदीमुळे चिंतेचे वातावरण आहे. बेरोजगारी कमी होत नसताना आता महागाईचे निर्देशांकही चढत्या क्रमावर असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अर्थसंकल्पात मंदी दूर करून विकासदर पुन्हा वाढण्यासाठी काय उपाययोजना करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.