Missing Link Accident: मिसिंग लिंकवरील अपघातात उद्योजकाचा मृत्यू ! अपघाताचे नेमकं कारण आले समोर; सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?
Missing Link Accident: मिसिंग लिंकच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह; बोगद्यात अनधिकृत वाहने थांबवण्यावर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.

Missing Link Accident – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात शुक्रवारी (दि. ७) पहाटे दीडच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वाकड येथील युवा उद्योजक व काँग्रेसचे युवा कार्यकर्ते तुषार भूमकर (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या भरधाव कारने मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
पुण्याहून मुंबईकडे जाणारी चारचाकी (एमएच १४ एमजी ०००७) मुंबईच्या दिशेने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू टेम्पोवर (एमएच ०१ सीआर ७०७५) आदळली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून कारमधील प्रसाद विनोदे, अमित भाटे, प्रदीप भुसारे आणि पंकज पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींना सुरुवातीला पवना हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, बोगद्यातील इतर दोन लेनमध्ये काही वाहने उभी असल्याने मार्गात अडथळा निर्माण झाला होता. त्याचवेळी भरधाव कारचे नियंत्रण सुटून ती समोरील टेम्पोवर आदळल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून त्याच्या आधारे महामार्ग पोलीस तपास करत आहेत. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास बंद ठेवून सर्व वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळविण्यात आली. तुषार भूमकर हे वाकडमधील भूमकर वस्ती परिसरातील रहिवासी होते.
सामाजिक कार्य आणि काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. फेब्रुवारीमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने काँग्रेसच्या तिकिटावर प्रभाग २५ मधून निवडणूक लढवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांचा मुलगा आणि दहा महिन्यांचे बाळ असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे वाकड परिसरात शोककळा पसरली आहे.
मिसिंग लिंकच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू झाल्यापासून दरडी कोसळण्याच्या घटना आणि आता झालेल्या भीषण अपघातामुळे या मार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. बोगद्यात अवजड वाहनांना प्रवेश होता का, तसेच इतर लेनमध्ये वाहने का उभी होती, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन, वेगमर्यादेची अंमलबजावणी आणि बोगद्यातील आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
महामार्ग पोलीसांसमोर तपासाचे आव्हान
महामार्ग पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि वाहनांच्या तांत्रिक तपासणीनंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी बोगद्यात अनधिकृत वाहन थांबविण्यावर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.






