Maval News: “साहेब, सांगा ना… आमचा पूल कधी होणार?”; १ वर्षापासून बंद असलेल्या पुलामुळे नागरिकांचे हाल
Maval News: पावसाळ्यात पवना धरणाच्या विसर्गामुळे रस्ता पाण्याखाली; शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह रुग्णांचे अतोनात हाल, ग्रामस्थांची तातडीने पुलाची मागणी.

Maval News – गेल्या दोन वर्षांपासून धोकादायक ठरलेला आणि वर्षभरापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असलेला कोथूर्णे पूल अद्यापही नव्याने उभारला गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे परीक्षण करून तो धोकादायक असल्याचे जाहीर केले.
त्यानंतर ग्रामपंचायतीने दोन्ही बाजूंना इशारा फलक लावून वाहतूक बंद केली. मात्र एक वर्ष उलटूनही नवीन पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्याने कोथूर्णे, वारू आणि मळवंडी ठुले येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पूल बंद झाल्यामुळे दुग्धव्यावसायिक, शेतकरी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांना पवनानगर किंवा कामशेत गाठण्यासाठी ब्राह्मणोली किंवा शिवली मार्गे तब्बल ६ ते ७ किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे.
त्यामुळे वेळ आणि इंधनाचा खर्च वाढत असून आर्थिक फटकाही बसत आहे. परिसरात सरकारी बससेवा नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. अनेकांना पायी प्रवास करावा लागत असून वृद्ध, महिला आणि रुग्णांचे हाल होत आहेत. पवना धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली जात असल्याने पायी जाण्याचाही मार्ग बंद होतो आणि गावांचा संपर्क तुटतो.
पवनानगर येथे माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय असल्याने या गावांतील विद्यार्थी दररोज याच मार्गाने ये-जा करतात. सकाळच्या वेळेत लांबचा वळसा घालावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शाळा-महाविद्यालय गाठणे कठीण होत आहे. प्रशासनाने केवळ इशारा फलक लावून जबाबदारी झटकू नये. नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





