पुणे – इंग्रजी भाषा हे ज्ञान नसून, माध्यम असल्याचे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील पालकांना मुलांनी इंग्रजी शाळेत शिकावे, असे वाटते आणि अशा कारणांमुळे महाराष्ट्र अमराठी होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तातडीने बदल होणार नसून, यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघ सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या “एक मित्र, एक पुस्तक’ या योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेसाठी देशमुख यांनी ग्रंथालयाला 11 पुस्तके भेट दिली. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संदीप जाधव यांनी कवितेचे वाचन केले.
केंद्राच्या सर्व आस्थापनांसह विविध ठिकाणी मराठी वापर गरजेचा आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेत व्यवहार होणाऱ्या ठिकाणी लोकव्यवहार मराठीत सुरू व्हावे. मराठीत भाषेमध्ये व्यवहार होण्यासाठी मराठी भाषा प्राधिकरणाची निर्मिती व्हावी. मराठी ज्ञानभाषेसाठी मराठी विद्यापीठ असावे, सरकारने वर्षाभरात त्याचा आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.