Marathi Sahitya Sammelan: मराठी साहित्य संमेलनासाठी तिजोरी उघडली; उदय सामंत यांची ५ कोटींच्या निधीची घोषणा
Marathi Sahitya Sammelan: १२ देशांमध्ये संमेलन आणि १३ विद्यापीठांमध्ये युवा साहित्य संमेलनाचे आयोजन; सीएसआर आणि सरकारी निधीतून आर्थिक मदत.

Marathi Sahitya Sammelan – आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पाच कोटी रुपये आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या विविध संमेलनांसाठी मिळून सुमारे १७ कोटी रुपये देण्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेत संमेलनासंदर्भातील बैठकीला सामंत उपस्थित होते.
मागील वर्षी कबूल केल्याप्रमाणे मसापच्या परिसर संवर्धनासाठी एक कोटी रुपयांचा धनादेश त्यांनी अध्यक्ष योगेश सोमण यांच्याकडे सुपूर्त केला. या वेळी मसापचे अध्यक्ष योगेश सोमण, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, प्रमुख कार्यवाह डाॅ. स्वाती म्हाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, स्थानिक कार्यवाह सुनील महाजन आणि मराठी भाषा विभागाचे संचालक शामकांत देवरे उपस्थित होते.
हे संमेलन १०० वे असल्याने १२ देशांमध्ये संमेलन करण्यात येणार असून, त्यासाठी सीएसआर मधून दोन कोटी रुपये, युवकांसाठी राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये साहित्य संमेलन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये असा चार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. याशिवाय विविध घटकांची ९९ साहित्य संमेलने भरवण्यात येणार आहेत, असे सामंत यांनी सांगितले.
मराठी भाषा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरांवर समन्वय साधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सल्लागार समितीप्रमाणेच सचिवस्तरीय बैठका नियमितपणे घेतल्या जात आहे. दरम्यान, संमेलन हे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी असून, त्याला वादाचे स्वरूप देणे योग्य नसल्याचे मत सामंत म्हणाले.
मराठी उत्कृष्टता केंद्र पुण्यात
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर स्थापन होणारे मराठी उत्कृष्टता केंद्र हे केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकारच्या निधीतून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र पुण्यात स्थापन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून निधीला अनेक वर्षांचा कालावधी लागतो, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून, याची सुरुवात पुढील पाच ते सहा महिन्यांत करणार असल्याचे सामंत म्हणाले.






