Manoj Jarange | MPSC students । Pune : पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत असतानाही राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. या विलंबामुळे अस्वस्थ झालेल्या ‘MPSC’च्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पुण्यात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल झाले असून, त्यामुळे आंदोलनाला अधिक धार मिळाल्याचे चित्र आहे. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडीला फोन केला. तसेच विखे पाटील यांच्याशीही थेट संपर्क साधत विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. प्रश्न सुटला नाही तर लक्षात ठेवा, निवडणुका तोंडावर आहेत. महापालिकेच्या निवडणुका आहेत,” असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतोच,असा ठाम निर्धार देखील मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पोलिसाला उचलून न्यायला लावलं एवढं सोपं आहे का? हा तुम्हाला? बघायचं आहे का? मुंबईत आता तुम्हाला सगळे पुण्यात दिसतील. महाराष्ट्रातले अख्खे पुण्यात मग पुणे जाम करायचं का? सरकार असलं सरकार असतं पुढं? असं देखील मनोज जरांगे यावेळी म्हणाले. नेमकं काय घडलं? पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल मध्यरात्री १.१३ वाजता आंदोलन सुरू केलं. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू केलं होतं. पुण्यातील शास्त्री रोडवर बसून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशीरा प्रसिद्ध झाल्याचे सांगत या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत. यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.