Manoj Jarange-Patil : “राज्याच्या ‘त्या’ मुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय” ; मनोज जरांगे पाटलांचा रोख कुणाकडे ?

Manoj Jarange-Patil : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलने आंदोलक करताना दिसून येत आहेत.सुरू आहेत. मात्र ही जाळपोळ मराठा समाजाकडून होत नसून यामागे दुसरेच कुणीतरी असल्याची शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यासोबतच आंदोलन चिघळल्यानंतर जालन्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.याच मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातूनच आपल्या आंदोलनाची सुरुवात केली होती. जालन्यातील नागरिकांच्या मोबाइलवर “शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, सेवा पुन्हा सुरळीत होताच आम्ही तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती देऊ”, असे संदेश मोबाइल कंपन्यांनी पाठवले आहेत. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी, ‘इंटरनेट सेवा बंद करण्याशिवाय शिंदे सरकारला दुसरं काही काम आहे का? हे असे बांगड्या भरल्यासारखे चाळे करायचे… यांना बांगड्या दिल्या पाहिजेत… हे लोक मर्दासारखं सरकार चालवत नाहीत… आतून काड्या करतात. कुठं नेट बंद कर.. कुठं अजून काहीतरी बंद कर..असं करून आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, तुम्ही जातीविरोधात मैदानात उतरलात तरी हे मराठ्यांचं आंदोलन आहे लक्षात ठेवा. हे आंदोलन आता थांबणार नाही.” असे म्हणत सरकारला इशारा दिला आहे.
त्यासोबतच आक्रमक आंदोलन करणाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी, आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे. तुमचं आंदोलन तुम्ही वेगळं करा.” असे म्हणत त्यांनी आपले आंदोलन शांततेत सुरु असल्याचे म्हटले आहे. तर सरकारला उद्देशून मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर, त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही तुम्हाला भाऊ म्हणतो. पण हा भाऊ सारखा दांडकं घेऊन आमच्याकडे येणार असेल तर आम्हालासुद्धा आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील. मग त्याला हे सरकार जबाबदार असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) याला जबाबदार असतील. त्यातला एक उपमुख्यमंत्री जास्त जबाबदार असेल. कारण, त्यालाच अशा काड्या करायची लई सवय आहे. ” असे म्हणत त्यांनी नेमका कोणाकडे इशारा केला आहे हे पाहणे गरजेचे आहे.





