‘धनंजय मुंडेंसाठी खंडणी मागितली हे आरोपींनी सांगून टाकावे’, जरांगे पाटलांनी टीका करत मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Jarange Patil on Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा लागला आहे. या हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आले आहे. मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या हत्या प्रकरणात मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे हे 302 चे आरोपी आहेत, त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, पैसेवाले झाल्यावर हे मस्तीखोर झाले. यांची अर्धी टोळी आत गेली आहे. धनंजय मुंडे 302 मध्ये आहेत. फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे मागणी करतो की पुरवणी तपास करा. पुरवणी तपासात सर्वांना सहआरोपी करा. धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा.’, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, आरोपीने कबुल करावे की मी धनंजय मुंडेसाठी खंडणी मागितली आणि पाप केलं. आतापर्यंत जेवढे खून केले ते मुंडेसाठीच केले. एक नंबरच्या आरोपीला सांगणं आहे, डोक्यावर पाप घेऊन फिरू नका. हा मजेत फिरेल. भाषणं करेल. त्याच्यासाठी केलं त्याचं नाव घ्या, असेही जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, देशमुख यांच्या हत्येचे फोटो मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्त राजीनामा देत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.





