Manikrao Kokate : कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी ‘मविआ’चे नेते थेट दिल्लीत; शिवराज सिंह चौहान यांना गाठलं, काय झाली चर्चा?

मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत ‘जंगली रम्मी’ खेळतानाच्या व्हायरल व्हिडीओने आणि शेतकरीविरोधी वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादाने आता राष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटवले आहेत. महाविकास आघाडीच्या खासदारांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मविआने कोकाटे यांना “शेतकरीविरोधी आणि असंवेदनशील” ठरवत त्यांच्या जागी संवेदनशील मंत्र्याची नियुक्ती करावी, अशी विनंती केली. मात्र, शिवराज सिंह चौहान यांनी या भेटीवर अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही, तर कोकाटे यांनी आपण दोषी आढळल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनात राजीनामा देण्याचे आश्वासन दिले आहे.
मविआच्या खासदारांचा दिल्ली दौरा
मविआच्या खासदारांनी 22 जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. या भेटीत सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील, विशाल पाटील, अरविंद सावंत, बजरंग सोनावणे, अमोल कोल्हे, वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर सहभागी झाले. मविआने कोकाटे यांच्या रम्मी व्हिडीओ प्रकरण आणि त्यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्यांचा मुद्दा उपस्थित केला.
सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले कि, महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने आणि वर्तणूकीमुळे चर्चेत आहेत.
शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो की कर्जमाफीच्या संदर्भात केलेले विधान असो. त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर होत आहेच, तसेच राज्याच्या उज्ज्वल परंपरेला धक्का देखील बसत आहे. म्हणूनच त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषीमंत्री महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी केली.
‘मी काय कोणाचा विनयभंग केला आहे, मी चोरी केलेली आहे का?’
“मी राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केला आहे, मी चोरी केलेली आहे का माझी पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? एक फोटो फक्त आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय विरोधकांनी मी त्यांना कोर्टात खेचणार आहे, अब्रुनुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे. मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन,” असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. Manikrao Kokate |
‘हा इतका छोटा विषय आहे’
“खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे. हा विषय इतका का वाढला हे समजत नाही. जंगली रमी हा विषय तुम्हाला माहित नाही का? असा गेम खेळताना तुम्हाला तुमचा फोन नंबर व बँक खाते क्रमांक देऊन नोंदणी करावी लागते. हा गेम आल्यापासून ते आतापर्यंतची माहिती तुम्ही तपासा. माझा नंबर किंवा बँक खातं अशा गेमशी संलग्न आहे का ते तपासा. मी प्रसारमाध्यमांना माझा फोन व बँक खाते क्रमांक देतो. तुम्ही चौकशी करा,” असे कोकाटे यांनी म्हंटले आहे.
“मला रमी खेळता येत नाही. हे सर्व आरोप खोटे आहेत, ज्यामुळे माझी राज्यभरात बदनामी झाली आहे. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे,” असा इशारा आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिला आहे. Manikrao Kokate |





