भाजप आमदाराची टीका
नवी दिल्ली: “एनआरसी’ला विरोध करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान बनावे, अशी टीका भाजपचे उत्तर प्रदेशातील बलिया येथील आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली आहे. “जर ममता बॅनर्जी यांना बांगलादेशींना ठेवून घ्यायचे असल्यास त्यांनी बांगलादेशचे पंतप्रधान बनावे. त्यांनी यासाठी धाडस असल्यास दाखवून द्यावे.’ असेही सिंह म्हणाले.
देशातील घुसखोरांना घालवून द्यायलाच हवे, याचा जोरदार पुरस्कार करत सुरेंद्र सिंह यांनी “एनआरसी’चे जोरदार समर्थन केले. अन्य देशातील नागरिकांनी निर्वासित म्हणून भारतात येऊन स्थायिक व्हावे आणि इथल्या राजकारणावर प्रभाव टाकावा, हे आम्ही कधीही मान्य करू शकत नाही, असेही सुरेंद्र सिंह म्हणाले.
बॅनर्जी यांनी आसाममधील “एनआरसी’ला कडाडून विरोध दर्शविला असून त्यांनी पश्चिम बंगालमध्ये यास परवानगी देणार नाही, असे म्हटले आहे. “एनआरसी’च्या नावाखाली पश्चिम बंगालमधील एकाही व्यक्तीला स्पर्श करण्याचे धाडस करून दाखवावे. मी जिवंत असेपर्यंत “एनआरसी’ बंगालमध्ये होऊ देणार नाही. जर मी मरण पावले तर माझे तरुण नेते धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडण्याच्या या षडयंत्रविरूद्ध लढा देतील, असे एका मेळाव्यात बोलताना बॅनर्जी म्हणाल्या.