Mamata Banerjee – भारतीय जनता पार्टीने कोणताही मागचा पुढचा विचार न करता देशात सीएए कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून देशात अस्वस्थता निर्माण होईल असा इशारा तृणमुल कॉंग्रेसचा प्रमुख ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. आज येथे एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, हा कायदा म्हणजे नागरीकांना नागरीकत्व प्रदान करणारा कायदा आहे असा दावा भाजपचे लोक करीत असले तरी प्रत्यक्षात या कायद्याचा वापर करून लोकांचे नागरीकत्वच हिरावून घेण्याचा त्यांचा डाव आहे असा आरोप त्यांनी केला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा कायदा आणून त्यांना धार्मिक धृवीकरण करायचे आहे. त्यातून मोठी अशांतता आणि अस्थिरता निर्माण होईल असा आरोप त्यांनी केला. सीएए कायद्याअंतर्गत लोकांनी अर्ज केल्यानंतर त्यांचे नागरीकत्व हिरावून घेतले जाईल आणि त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले जाईल. या कायद्यानंतर लगेचच एनआरसी लागू केली जाईल. आत्तापर्यंत केवळ आसामातच एनआरसी केली गेली आहे. आता ती बंगालमध्ये लागू करण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप त्यांनी केला. धर्माच्या आधारावर नागरीकत्व देण्याचा प्रयोग जगात अन्य देशात कधी झाला आहे काय असा सवालही त्यांनी केला.