‘लोकसभा निवडणुकीत 20-30 अधिक जागा जिंकल्या असत्या तर…’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे मोठे वक्तव्य

Mallikarjun Kharge | लोकसभा निवडणुकीत 20-30 अधिक जागा जिंकल्या असत्या तर आपण सरकार स्थापन करू शकलो असतो, असे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. खरगे यांनी दिल्लीत पक्षाच्या जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आपली विचारधारा मजबूत आहे. मात्र, सत्ता असताना ती लागू करू शकत नाही. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 100 जागा मिळाल्या, जर आपण आणखी मेहनत केली असती तर 20-30 अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करू शकलो असतो. काँग्रेसची लढाई संसदेत आणि बाहेर दोन्ही भाजप आणि आरएसएस विरुद्ध असल्याचेही ते म्हणाले. खरगे यांच्या या वक्तव्याची आता चर्चा होत आहे.
नवी दिल्लीमध्ये काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजपविरुद्ध निवडणूक लढवली आणि त्याला 240 जागांवर रोखले. जर काँग्रेस पार्टीला आणखी 20-30 जागा मिळाल्या असत्या, तर एक पर्यायी सरकार स्थापन करता आले असते.
आपल्या संविधान बचाओ मोहिमेने भाजप आणि आरएसएसच्या संविधान बदलण्याच्या इच्छेला उघड केले. आज भाजपकडे बहुमत नाही आणि ते दोन सहकारी पक्षांवर अवलंबून आहेत. एक पंतप्रधान ज्यांनी अहंकाराने दावा केला होता की ते 400 जागा जिंकणार आहेत, त्यांना आपण एक मोठा धक्का दिला आहे, असे म्हणत खरगे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.





