प्रभात वृत्तसेवा वाई – इच्छुक असणे गैर नाही. पण निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल. यासाठी सर्व नवीन- जुन्या प्रत्येक कार्यकर्त्यांने एकसंघपणे काम करुन वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष आपल्या विचारांचा निवडून आणायचे आहेत, २४ पैकी २४ जागा जिंकणे हेच आपले ध्येय आहे, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिला.वाई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे कार्यकर्त्यांच्या बैठकीत मकरंद पाटील बोलत होते. आ. मकरंद पाटील म्हणाले की, “आज बैठक बोलावली होती. पण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे ती मेळावा स्वरूपात पार पडली. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पक्ष बळकट आहे आणि इच्छुकांची संख्या मोठी आहे. इच्छुक असणे गैर नाही, पण अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल आणि तो सर्वांनी मान्य करणे आवश्यक आहे. मी दररोज कार्यकर्त्यांमध्ये फिरतो. जो प्रामाणिक आहे, लोकांचे प्रश्न सोडवतो, नागरिकांशी थेट संपर्क ठेवतो, त्यालाच पक्षाची उमेदवारी मिळेल. लोकप्रियता आणि कामगिरी हेच निकष असतील. नागरिकांपर्यंत पोहोचणारा चेहरा हवा, ही वाईकरांची मागणी आहे.”राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख करत पाटील म्हणाले, “मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तीन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना मदत, तसेच पडझड झालेल्या विहिरींसाठी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी मदत यापूर्वी कधीच झाली नव्हती.” मी मंत्री झाल्यापासून मतदारसंघातील प्रलंबित कामांवर विशेष लक्ष दिले आहे. २४ पैकी २४ जागा जिंकणे हेच आपले ध्येय आहे. चुकीची कामे करणाऱ्यांना आता माफी नाही. निवडणुकीच्या काळात मी वाईतच राहून सर्व जबाबदाऱ्या पार पाडणार आहे.” बैठकीत विविध कार्यकर्त्यांनी निवडणुकीसंदर्भात सूचना मांडल्या. कोअर कमिटी स्थापन करण्याची सूचना मोहजम इनामदार यांनी केली. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे व जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन श्रीकांत सावंत यांनी केले. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना समान संधी मिळावी, असे मत लालू शिंगटे यांनी व्यक्त केले. पक्ष बदललेल्या व्यक्तींना संधी न देण्याचा आग्रह विलास देशमुख यांनी धरला. सामाजिक पार्श्वभूमी असलेला चेहरा निवडण्याची सूचना सौ. चव्हाण यांनी केली. ॲड. रवींद्र भोसले यांनी पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, असे सांगितले. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे, असे मत राजेश गुरव यांनी मांडले. गटबाजी व शक्तीप्रदर्शन टाळण्याचा सल्ला गोविंद इथापे यांनी दिला. सहज उपलब्ध, लोकांमध्ये वावरणारा चेहरा निवडण्याचा आग्रह धरला. नागरिकांचा विश्वास हेच आमचे बळ “शक्तीप्रदर्शन करु नका, त्यामुळे मनोमालिन्य निर्माण होते. इच्छुक असणे ही लोकशाही आहे, पण नव्या कार्यकर्त्यांना प्रेमाने सामावून घेणे आणि जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना साथ देणे आवश्यक आहे. एकजुटीनेच पक्ष बळकट होतो. वाईतील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दाखवलेला विश्वास हेच आमचे बळ आहे. तो विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने संघटनेच्या हिताला प्राधान्य द्यावे.” असे ना. मकरंद. पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले.