Makrand Patil – ना. मकरंद पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी केलेल्या सकारात्मक चर्चेमुळे आणि दोन्ही पक्षांच्या वरीष्ठ पातळीवरील घडामोडीमुळे अखेर काँग्रेसने बारामती मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या रिंगणातून आपला उमेदवाराची माघार घेतली. त्यामुळे मंत्री मकरंद आबांच्या शिष्टाईला यश आल्याचे स्पष्ट झाले असून त्यानी आपल्या नेतृत्त्वाची छाप राज्यपातळीवर उमटविली आहे. जिल्ह्याचे सुपुत्र ना. मकरंद पाटील यांनी राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री म्हणून दमदार आणि दर्जेदार कामगिरी केली आहेच. त्याचबरोबर राज्याच्या राजकारणातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटना बांधणीतही मोठे योगदान दिले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. काँग्रेसनेही आपला उमेदवार माघार घेऊन मकरंद आबांच्या भूमिकेला यशस्वी दुजोरा दिला. त्यामुळे मंत्री मकरंद पाटील यांचे नेतृत्वाला आणि कर्तृत्वाला पुन्हा नवा उजाळा मिळाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हर्षवर्धन सपकाळ त्यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा अर्ज माघारी घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून आणि महायुतीकडून फोनवरून काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर चर्चा केली होती. मात्र, सुनेत्राताईंचा विजय सुकर व्हावा यासाठी मंत्री मकरंद पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन त्यांच्याशी निवडणूकीबाबत चर्चा केली. लोकशाही प्रक्रियेला सहकार्य करत विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देण्याची राष्ट्रवादीची भूमिका यावेळी त्यांनी मांडली. या सकारात्मक चर्चेमुळे आणि दोन्ही पक्षांच्या वरीष्ठ पातळीवरील घडामोडीमुळे अखेर काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतला आहे. यामुळे मंत्री मकरंद आबांच्या शिष्टाईला यश आल्याचे दिसून येते. मंत्रिमंडळात वेगळी छाप … मकरंद पाटील यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उल्लेखनीय कामकाज करुन आपल्या कर्तृत्वाची मोहोर राज्यभर उमटविली आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्यावतीने राज्यातील अवकाळी आणि इतर नैसर्गिक संकटामुळे बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करुन अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना, पिडीतांना २० हजार कोटीपेक्षा अधिकच्या मदतीचा हात दिला आहे. याशिवाय विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांच्या विविध प्रश्नांना योग्य पुराव्यांसह उत्तरे दिली आहेत. त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे विरोधी आमदारांनीही सभागृहात त्यांच्या कार्याचे कौतुक केले.