Mahindra in Maharashtra: महिंद्रा समूहाची महाराष्ट्रात 15 हजार कोटींची गुंतवणूक; नागपुरात उभारणार मोठा प्रकल्प
Mahindra in Maharashtra:

Mahindra in Maharashtra: महिंद्रा उद्योग समूहाने पुढील दहा वर्षात महाराष्ट्रात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीतून महिंद्रा समूह नागपूर येथे वाहन आणि ट्रॅक्टर निर्मितीचा मोठा प्रकल्प उभारणार आहे. त्याचबरोबर इगतपुरी- नाशिक येथील प्रकल्पाचे विस्तारीकरण करणार आहेत.
महिंद्रा समूहाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समूह नाशिक -इगतपुरी येथील प्रकल्पासाठी लवकरच जमिनीचे अधिग्रहण करणार आहे. या ठिकाणी वाहनांच्या इंजिनाची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील तीन ठिकाणी हा समूह जमिन अधिग्रहण करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
नागपूर येथील प्रकल्प 2028 पासून ट्रॅक्टर आणि वाहनांची निर्मिती करेल. हा प्रकल्प महिंद्राचा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला येथे पाच लाख वाहनांची आणि एक लाख ट्रॅक्टरची निर्मिती होऊ शकेल असे सांगण्यात आले. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे कार्यकारी संचालक आणि वाहन व कृषी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश जेजुरीकर यांनी सांगितले की, नागपूरमधील प्रकल्प एकात्मिक स्वरूपाचा असणार आहे.
RBI New Rule:ऑनलाइन फ्रॉड झाल्यास RBI कडून मिळणार 25 हजार रुपयांपर्यंत भरपाई; जाणून घ्या नवा नियम
नवी दिल्ली येथे अॅॅडव्हेंटेज विदर्भ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात बोलताना राजेश जेजुरीकर यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रातील वातावरण आणि कुशल मनुष्यबाळ मोठ्या उद्योगांच्या वाढीसाठी पूरक आहे. त्यामुळेच महिंद्रा कंपनीने आपला सर्वात मोठा प्रकल्प नागपूर येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे नागपूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि या भागाचा विकास होण्यास मदत होईल असे फडणवीस यांनी सांगितले. या कार्यक्रमात इतरही देशातील आणि परदेशातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून त्यांनीही या भागांमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली असल्याचे सांगण्यात आले.





