Santosh Bangar | Har Ghar Tiranga – हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी स्वातंत्र्य दिनी हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी झेंडे घेऊन देण्यासाठी दूरध्वनी केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दूरध्वनी स्वीकारला नाही म्हणूनही जिल्हाध्यक्षांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वरिष्ठ नेते येत असल्याचे सांगत लागणारा सर्व खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करुन घेतला असल्याच्या आरोपामुळे महायुतीमधील वाद समोर आला आहे. दरम्यान या आरोपात काही तथ्य नाही. शासनाकडूनच ध्वज पुरविण्यात येणार होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील गेल्या वर्षीचे दोन हजार तिरंगी ध्वज उपलब्ध करुन दिले. आपले पाप झाकण्यासाठी आमदार बांगर बेछूट आरोप करू लागले असल्याचे घुगे म्हणाले. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी मेघना बोर्डीकर यांच्या बैठकीत जिल्हाध्यक्षांनी केलेल्या आरेरावी बरोबर शासकीय यंत्रणांकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष कोणत्याही कारणासाठी पैसे मागत आहेत. अगदी ग्रामसेवकापासून ते स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत रक्कम मागितली जात आहे. मुख्यमंत्री आमचे आहेत, असा धमकीवजा सूर वापरला जात असल्याचाही बांगर यांचा आरोप आहे. थेट शिवसेनेच्या शिंदे गटाच्याा आमदारांनी भाजप जिल्हाध्यक्षाची तक्रार केल्याने महायुतीमधील मतभेत पुढे आले आहेत. या सर्व घटनांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचेही बांगर यांनी म्हटले आहे. तर घुगे यांनीही बांगर यांच्यावर पलटवार केला. कोण कशी संपत्ती कमावते आहे सर्वाना माहीत आहे, अशा शब्दांत बांगर यांना प्रत्युत्तर दिले.