राज्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संदर्भात तब्बल १०,००० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा गंभीर आरोप समोर आला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी थेट आरोप करत काही खासगी कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राटे मिळवल्याचा दावा केला आहे. कोणत्या कंपन्यांवर आरोप? दानवे यांच्या आरोपानुसार, NOPL Green, NACOF, IIPL आणि ONIX या कंपन्यांनी कथितपणे बनावट बँक हमीपत्रे (Bank Guarantee) सादर करून कंत्राटे मिळवली. या प्रक्रियेत अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात महावितरण (MSEDCL) मधील काही अधिकारी आणि संबंधित कंपन्यांचे संचालक दिव्येश सावलिया, पी. सुरेश बाबू आदींची नावे दानवे यांनी घेतली आहेत. EOW कडे गुन्हे दाखल दानवे यांनी दावा केला की आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) या संदर्भात पाच गुन्हे दाखल झाले असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सौर योजनेतच अनियमितता झाल्याचा आरोप असल्याने प्रकरण अधिक संवेदनशील ठरत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पारदर्शक असल्याचा दावा करणाऱ्या सरकारने या प्रकरणात सखोल चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि नुकसान झाल्यास वसुली करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारकडून प्रतिक्रिया? या गंभीर आरोपांवर अद्याप सरकारकडून अधिकृत सविस्तर प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आरोपांमुळे सौर कृषी योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात चौकशीची दिशा काय असणार आणि प्रत्यक्षात घोटाळा झाला आहे का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.