महाराष्ट्रातील निवडणुका घोटाळ्याने जिंकल्या…, काँग्रेसच्या अधिवेशनात मल्लिकार्जुन खरगेंची भाजपवर सडकून टीका

Mallikarjun Kharge | काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत “मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार” केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशा स्वरूपाचा घोटाळा यापूर्वी कधीही देशाने पाहिला नव्हता,” असे म्हणत त्यांनी मतमोजणीसाठी पुन्हा एकदा बॅलेट पेपरचा वापर करायला हवे असे मत व्यक्त केली.
अहमदाबाद येथे आयोजित अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) विशेष सत्रात बोलताना खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेस पक्षाचे ८४ वे अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून 1700 हून अधिक काँग्रेस प्रतिनिधी यात सहभागी होत आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, हे सरकार भांडवलदारांच्या फायद्यासाठी काम करत असून, सरकारी मालमत्ता विकून लोकशाही हळूहळू संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
खरगे पुढे म्हणाले, संपूर्ण जग पुन्हा बॅलेट पेपरकडे वळत आहे, मात्र आपल्याकडे अजूनही ईव्हीएमवर विसंबून आहे. ही सगळी एकप्रकारची फसवणूक आहे. सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो.
महाराष्ट्रातील निवडणुकीचा संदर्भ देत विचारलं की, महाराष्ट्रात नक्की काय झालं? आम्ही हे प्रकरण प्रत्येक ठिकाणी मांडलं. राहुल गांधींनीही या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवला. मतदार याद्यांमध्येही घोटाळा झाला. हरियाणामध्येही असंच काहीसे घडले.
खरगे यांनी दावा केला की, “भाजपने 90 टक्के जागा जिंकल्या, हे याआधी कधीच घडलं नव्हतं. महाराष्ट्रात जो प्रकार घडला, तो लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक होता. आम्ही या प्रकरणाचा पूर्ण तपास करू. चोर शेवटी पकडला जातोच. आमचे वकील आणि नेते यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.
मी कुठेच ऐकलं नाही, कुठेच पाहिलं देखील नाही. भाजप इथे 150 जागा लढवते आणि त्यापैकी 138 जागांवर जिंकून येते. 90 टक्के रिझल्ट? इतका मोठा रिझल्ट या देशात कधी पाहिला आहे का? आम्ही देखील अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. मी सुद्धा 12 ते 13 निवडणुका लढलो आहे. असं कधीच झालं नाही. जो घोटाळा महाराष्ट्रात झाला तो फक्त लोकशाहीला नष्ट करण्यासाठी केला, तसेच विरोधकांचा पराभव करण्यासाठी केलं आहे. आपल्याला या विरोधात लढायचं आहे, असेही खरगे म्हणाले.
गेल्या 11 वर्षांपासून भाजप सरकार संविधानावर सतत हल्ला करत आहे. संवैधानिक संस्था आणि मूल्यांवर गदा आणली जात आहे. याचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.





