Maharashtra Politics : “लोकांना बनवायचे तर किती बनवायचे..”; टोलप्रश्नावरून गजानन काळेंची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (7 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्गावरील टोलनाके बंद करण्याची मागणी करताना राज्य सरकारवर निशाणा साधला होता.
मुंबईतील पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गाची देखभाल होत नसेल तर मग टोल कशाला घेताय? रस्त्यावर खड्डे असतील तर MSRDC टोल कशाला घेते? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले होते.
टोलनाके बंद करण्यावरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंंवर खोचक टीका केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “आमचं सरकार आल की टोल बंद करू … – आदू बाळ, मग २०१४ ते २०१९ पर्यंत भाजपा बरोबर सरकारमध्ये चंद्र,सूर्य,तारे होते का? …असा खोचक सवाल केेेेला आहे. २०१९ ला झुकेरबर्ग मुख्यमंत्री होता वाटतंय …लोकांना बनवायचे तर किती बनवायचे .. काही मर्यादा …!!! असं देखील गजानन काळे यांनी म्हटले आहे.
गजानन काळेंसह मनसे नेते अमेय खोपकर यांनी सुध्दा टोल प्रश्नावरून आदित्य ठाकरेंंवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की,”राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर 65 टोलनाके बंद झाले. आम्ही बोलत नाही करुन दाखवतो.उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचं का नाही सुचलं?
धमक नाही तर फुकाची आश्वासनं द्यायची कशाला? असल्या टोलवाटोलवीला लोकं कंटाळली आता, तेव्हा नुसतं बोलू नका, आमच्यासारखी करुन दाखवायची हिंमत ठेवा, अशा शब्दात अमेय खोपकर यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले आहे.






