Maharashtra Politics : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का (Maharashtra Politics) बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी उमेदवारीसाठी सर्वाधिक ताकद लावलेल्या भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा लढवलेले अनिल सावंत हे दोघेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश (Maharashtra Politics) करण्याच्या तयारीत असल्याचे वर्तवले जात आहे. उद्या मंगळवेढ्यात होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विचारविनिमय बैठकीत या दोघांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतील गोंधळ २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भगीरथ भालके आणि अनिल सावंत हे दोघेही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. भालके यांना खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट दिल्लीला घेऊन काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून दिली होती. मात्र महाविकास आघाडीतील समन्वयात अपयश आल्याने पंढरपूरात ‘दोस्ती राज्यात आणि कुस्ती पंढरपुरात’ असे चित्र दिसले. Maharashtra Politics भगीरथ भालके यांनी काँग्रेसकडून तर अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली. दोघांमधील मत विभागणीमुळे भाजपचे समाधान आवताडे हे साडेआठ हजार मतांनी विजयी झाले. अनिल सावंत यांच्या मतांमुळे भालके यांचा पराभव झाल्याचे मानले जाते. पक्षांतर्गत नाराजी विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत विरोधी उमेदवाराचा प्रचार केला होता. प्रणिती शिंदे यांनी या बंडखोरांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे भालके समर्थकांना खटकले. नंतर तेच पदाधिकारी पुन्हा शिंदे यांच्याजवळ दिसू लागल्याने भालके समर्थकांमध्ये नाराजी वाढली. पक्षविरोधी कारवाई न करता बंडखोरांना अभय दिल्याने भगीरथ भालके आणि प्रणिती शिंदे यांच्यातील दुरावा वाढला. दुसरीकडे, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात भगीरथ भालके यांना निवडणुकीपूर्वी शिवसेनेत आले असते तर परिणाम वेगळा असता, असे संकेत दिले होते. निवडणुकीनंतर भालके आणि सावंत यांच्यात सलगी वाढल्याचे नगरपालिका निवडणुकीत दिसून आले. सावंत परिवाराच्या पाठिंब्यामुळे डॉ. प्रणिता भालके यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. मंगळवेढ्यातही भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले. मात्र झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आले नाही. सत्तेसोबत जाण्याची तयारी विधानसभा निवडणुकीला अजून साडेतीन वर्षांचा अवकाश असला तरी, सरकार दरबारी कामे होत नसल्याने अनेक कार्यकर्त्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे सत्तेसोबत जाण्याची भूमिका कार्यकर्त्यांमध्ये वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भगीरथ भालके हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांच्या मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी जवळीक साधल्याने तेही पवार गट सोडून स्वगृही (शिवसेना) जाण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत. आमदार तानाजी सावंत यांच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरातील अनेक प्रश्न मार्गी लावल्याने आणि काही शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेसोबत जाण्याची तयारी दिसते. उद्या मंगळवेढ्यात निर्णायक बैठक भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उद्या मंगळवेढ्यात विशेष मेळावा बोलावला आहे. या बैठकीत दोघांच्या शिवसेना प्रवेशावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप हे एकत्र आहेत, त्यामुळे आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीचे चित्र कसे असणार, याची चर्चा सुरू झाली आहे.