होती दाढी म्हणून तुमची उद्धवस्त झाली महाराष्ट्र विरोधी आघाडी; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

रत्नागिरी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार यात्रा आज रत्नागिरीत पोहोचली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला खोक्यात बंद करण्याचं काम केलं. ते म्हणायचे की कोण एकनाथ शिंदे, कोण रामदास कदम? पण आम्ही कोण आहोत हे त्यांना दाखवून दिलं. त्यामुळे दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
एकनाथ शिंदे म्हणाले, नारायण राणेंना सर्वात जास्त माहिती आहे की, कुणाचे खोके कुठे आहेत? या महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना खोक्यात बंद करुन टाकलं आहे. आता तरी खोके म्हणायचं बंद करा. पण रस्सी जळाली तरी रस्सीचा पीळ जात नाही. कोकणात शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे आणि रामदास कदम यांनी त्या काळात खूप काम केलं. मी देखील नेहमी सांगायचो की जर पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या, त्यांना वाढवा. मात्र, याबाबतचा अनुभव रामदास कदम यांनी घेतला. नारायण राणे यांनी देखील याचा अनुभव घेतला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपल्या पक्षात कोणीही मालक नाही. राजाचा मुलगा राजा नाही, तर जो काम करेल तो राजा बनेल असा आपला पक्ष आहे. आधी ते म्हणायचे की कोण एकनाथ शिंदे? कोण रामदास कदम? पण आम्ही कोण आहोत हे त्यांना दाखवून दिलं. आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे आणि न्याय देणारे लोक आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
राजन साळवी आपल्याकडे आले आहेत. पण त्यांनी खरं तर अडीच वर्षांपूर्वीच आपल्याकडे यायला पाहिजे होतं. पण आता ते आपल्याकडे आलेत. कोकणात एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेत का येत आहेत? ज्या पक्षाला विचारांची वाळवी लागली त्या पक्षात राजन साळवी तरी कसे राहतील? मग तेही आले शिवसेनेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
होती दाढी म्हणून उद्धवस्त झाली आघाडी
ते पुढे म्हणाले की, होती दाढी म्हणून तुमची उद्धवस्त झाली महाराष्ट्र विरोधी आघाडी, आणि सुरू झाली विकासाची आघाडी. कशाला माझ्या नादाला लागता. मी कुणाच्या नादी लागत नाही. मी आरोपाला उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर देतो. विकासाची कोणतीही योजना बंद होणार नाही. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. आम्ही पूर्ण विचार करून योजना केल्या आहेत, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.





