Ramdas Kadam : “बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले, बॉडीचा दोन दिवस छळ केला..”; रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

Ramdas Kadam | Uddhav Thackeray | Bal Thackeray : शिंदेच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी विविध मुद्यावर भाष्य करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. याच मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत खळबळजनक माहिती दिली. माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा, असं ते म्हणाले.
मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत असल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर ठेवला होता हे मला त्या डॉक्टरांनी सांगितलं, असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे. आज मला बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलले, असं रामदास कदम यांनी मेळाव्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना सांगितलं.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा सवाल उपस्थित करून त्यांनी चांगलीच खळबळ उडावली. यानंतर आज रामदास कदम यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा आव्हान दिलं आहे.
मी जे बोललो त्यावर उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावे. बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला. मी खोटो बोलतोय तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट होऊन जाऊ देत, असं खुलं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलं. बाळासाहेब ठाकरेंच्या हातांच्या ठसाचा उपयोग कशासाठी झाला, याबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, असंही रामदास कदम म्हणाले.





