मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आजपर्यंत ५५२ उमेदवारांचे ७२० नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. (Maharashtra Assembly Election 2024) महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.