Maharashtra Assembly Election 2024 : राहुल गांधी 6 नोव्हेंबरला महाराष्ट्रात; काँग्रेसच्या प्रचाराचा फोडणार नारळ

Maharashtra Assembly Election 2024 – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 6 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती काँग्रेसने बुधवारी दिली. यामुळे त्याच दिवशी काँग्रेस आपल्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काँग्रेसने यावेळी महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचेही ठणकावून सांगितले.
महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल.
महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपायुतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड गोंधळ आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या जागांवरही भाजपानेच उमेदवार दिले असून या दोन्ही पक्षांना संपवण्याची भाजपाची ही सुरुवात आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महायुतीचे सरकार भ्रष्ट आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून सरकारने दोन वर्ष महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेले, जाता जाता युती सरकारने भरमसाठ निर्णय जाहीर केले पण त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे.
सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडकी बहीण योजना बंद पडली आहे. भ्रष्टाचारी भाजपा युती सरकारला घालवण्याचा निर्धार जनतेने केला आहे. आता भाजपायुतीचे भ्रष्ट सरकार जाऊन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
रुग्णवाहिका खरेदीत 8 हजार कोटींचा घोटाळा
भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. आरोग्य विभागात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून रुग्णवाहिकांच्या खरेदीत ८ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. आरोग्य विभागात तब्बल २० हजार पदे रिक्त आहेत, असेही काँग्रेसने यावेळी म्हटले.
44 लाख विद्यार्थी गणवेशाच्या प्रतिक्षेत
शिक्षण क्षेत्रातही अनागोंदी कारभार असून ४४ लाख मुलांना अजून गणवेशही मिळालेले नाहीत. राज्यातील जिल्हा परिषदेच्या १४ हजार शाळा बंद करुन गरिब व मध्यमवर्गियांना शिक्षणापासून वंचित करण्याचे काम सुरु झाले आहे.
दत्तक शाळा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा अदानीला देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस कितीही दावा करत असले तरी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग प्रकल्पही गुजरातने पळवला, असेही पटोलेंनी यावेळी सांगितले.





