Maharashtra Assembly Election 2024 : “या निकालांवर माझा विश्वास बसू शकत नाही…”; विधानसभा निवडणूक निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांचे निकाल आज शनिवारी जाहीर होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, प्राथमिक मतमोजणीत राज्यात महायुतीने २१६ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात भाजप १२२, शिंदेंची शिवसेना ५७, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने ३७ जागांवर आघाडी घेतली आहे.
तर महाविकास आघाडीने ४८ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १८, काँग्रेस २० आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १० जागांवर आघाडीवर आहे. इतर आणि अपक्ष मिळून २० जागांवर आघाडीवर आहेत. अश्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप केला आहे.
‘हा निकाल जनतेचा कौला नसून, हा निकाल लावून घेतलेला आहे. या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याचा’ आरोप राऊत यांनी केला आहे. आज समाज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी निवडणुकांच्या निकालावर भाष्य केलं आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘जो निकाल दिसत आहे त्यावरुन माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला तो म्हणजे काहीतरी गडबड आहे. एकनाथ शिंदे यांना 56 जागा कोणत्या भरवशावर मिळत आहेत. अजित पवारांना ४० च्या वर जागा मिळत आहेत.
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी असे काय दिवे लावले आहेत, की त्यांना १२० च्या वर जागा मिळत आहेत. महाराष्ट्रातील वातावरण, कल ज्या प्रकारे होता ते पाहता हा लोकशाहीचा कौल वाटत नाही. हा मान्य कसा करावा असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेलाही पडला असेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले, “मी परत सांगतो काहीतरी गडबड आहे. मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर अदानीचं बारीक लक्ष होतं. अमेरिकेत अदानीवर झालेले आरोप खरंतर भाजपवर व शिंदेंवर होते. या निवडणुकीत अदानीनं पूर्ण ताकद लावली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदी-शहा इथून गायब झाले होते. या सगळ्यामागे मोठं कारस्थान आहे.
हा निकाल जनतेचा कौल आहे असं मानायला आम्ही तयार नाही. लोकशाहीत जय पराजय होत असतात. पण हे निकाल लावून घेतले गेले आहेत. या निकालांवर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्याचा विश्वास बसू शकत नाही, असं राऊत म्हणाले.
मुंबई विकायला काढण्याचा डाव असून, आमचा त्याला विरोध आहे. आमचा विरोध मोडून काढण्यासाठी हे निकाल लावून घेतलेले आहेत. महाराष्ट्रात असे निकाल कधी लागूच शकत नाहीत असं संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही गाफील नव्हतो, मात्र हा जनतेचा कौल नाही.
हा अदानी आणि त्यांच्या टोळीने लावून घेतलेला कौल आहे असंही ते म्हणाले. एकनाथ शिदेंना २० च्या वर जागा मिळणार नाही असा भाजपाचाही अंदाज होता. भाजपा ६५ ते ७० जागा जिंकेल असा अंदाज होता असंही संजय राऊत म्हणाले. पण यंत्रणाच ताब्यात घेतल्या आहेत असंही राऊतांनी सांगितलं.





