लखनौ/ प्रयागराज – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी आतापर्यंत 53 कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. दरम्यान, 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आणि 36 जण जखमी झाले. दुसरीकडे, स्वतःच्या वाहनांनी प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी जाणारे लोकही अपघातांचे बळी ठरले आहेत. महाकुंभ पर्व सुरू असताना येणाऱ्या भाविकांचे 10 हून अधिक रस्ते अपघात झाले असून यात 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर 70 हून अधिक भाविक जखमी झाले. या अपघातांबाबत, द टेलिग्राफच्या वृत्तात पोलिस सूत्रांचा हवाला देऊन असा दावा करण्यात आला आहे की, रस्ते अपघातांमध्ये वाढ चालकांच्या थकव्यामुळे झाली आहे. न थांबता सलग प्रवास करावा लागत असल्यामुळे चालकांची पुरेशी झोप झालेली नाही व हीच बाब बहुतांश अपघातांना कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते आहे. लखनौमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सामान्य लोकांना महाकुंभाला जाणे कठीण झाले आहे. प्रयागराजच्या सीमेवर पोहोचल्यानंतरही त्यांना महाकुंभात पोहोचण्यासाठी 6-8 तास लागत आहेत. 14 जानेवारी रोजी मेळा अधिकृतपणे सुरू झाला, तरीही अनेक वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. ते म्हणाले की, मेळा परिसरात चालक आणि भाविकांना विश्रांती घेण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे रस्त्यांवर अपघात होत आहेत. आम्हाला वाटत होते की वसंत पंचमी स्नानानंतर भाविकांचा ओघ कमी होईल, परंतु 3 फेब्रुवारीनंतरही मोठ्या संख्येने लोक येत आहेत. 3 तारखेनंतर गर्दी कमी होईल आणि प्रवास करणे सोपे होईल अशी अनेक भाविकांना आशा होती, मात्र गर्दीचा ओघ त्यानंतरच वाढत गेला. अखिलेश यांनी आरोप केले – दुसरीकडे, या मुद्द्यावर, समाजवादी पक्षाचे (सपा) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला आणि महाकुंभात गैरव्यवस्थापनाचा आरोप केला. तिथे प्रवास करताना जीव गमावलेल्या भाविकांना नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. महाकुंभ भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसेस आणि इतर वाहनांचे अपघात होत असल्याच्या बातम्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जे खूप दुःखद आहे असे आपल्या पोस्टमध्ये नमूद करत अखिलेश म्हणाले की अपाघातांमागील मुख्य कारण म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळामुळे चालकांची अवस्था खूपच वाईट आहे. त्यांचा थकवा जात नाहीये आणि त्यांना पुरेशी झोपही मिळत नाहीये. अशा परिस्थितीत ते अर्ध झोपेच्या अवस्थेत गाडी चालवत आहेत, ज्यामुळे अपघात होत आहेत. दर तासाला 1000 गाड्या – प्रयागराजच्या सीमेवरील वाहनांच्या हालचालींबद्दल बोलायचे झाले तर, 16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अपडेटनुसार, गेल्या 24 तासांत मध्य प्रदेशातील रेवा येथून प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ नोंदली गेली आहे, त्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की दर तासाला सुमारे 1000 वाहने रेवा जिल्ह्यातील चकघाट सीमेवरून प्रयागराजकडे जात आहेत, तर सुमारे 800 वाहने तेथून परत येत आहेत. प्रयागराज हे रेवा जिल्ह्यातील चकघाट सीमेपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे.